"महाराष्ट्र फक्त मराठा समाजासाठीच आहे का?' मराठा समाजासाठी आठ योजनांच्या घोषणेवर लक्ष्मण हाकेचा सरकारला सवाल
राज्य सरकारतर्फे आज (शुक्रवार, ५ जून) सकाळीच मराठा आरक्षण आंदोलनातील मृतांच्या वारसांना आर्थिक मदत देण्याचा निर्णय मंजूर करण्यात आला होता. अश्यातच, आता मराठा समाजासाठी ८ विशेष योजना सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शासनाच्या या निर्णयानुसार, मराठा समाजातील हजारो विद्यार्थ्यांना उच्च आणि व्यावसायिक शिक्षणासाठी मोठा दिलासा मिळणार आहे. अश्यातच आता या निर्णायावरून ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी प्रतिक्रिया दिल्या असून “महाराष्ट्र म्हणजे फक्त मराठा समाजासाठीच आहे का?” असा सवाल उपस्थित केला आहे.
राज्यातील मराठा समाजबांधवांसाठी आनंदाची बातमी असून राज्य सरकारने मराठा समाजच्या आर्थिक आणि शैक्षणिक प्रगतीसाठी एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. आता इतर मागासवर्गीय समजाप्रमाणेच मराठा समाजातील विद्यार्थ्यांनाही शैक्षणिक सवलती आणि इतर सोयी-सुविधा लागू करण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याच अनुषंगाने मराठा समाजासाठी ८ विशेष योजना सुरु करण्यात आल्या आहेत.
राज्य सरकारच्या या निर्णयानंतर लक्ष्मण हाके म्हणाले, “ओबीसी समाजातील योजनांना निधी नाही, ओबीसी महामंडळाला अध्यक्ष नाही. समाज कल्याण विभागाचा हजारो कोटी रुपयांचा निधी इतरत्र वळवला जातो. ओबीसी समुदायातील १८ महामंडळांची घोषणा निवडणुकीला सामोरे जाताना सरकारने केली होती. पण त्या १८ महामंडळाला साधा अध्यक्षही नाही आणि निधी सुद्धा नाही, कार्यालय नाही आणि शिपाई पण नाही. महाराष्ट्र फक्त मराठा समाजासाठीच आहे का?” असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.
ते पुढे म्हणाले, “मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी काही सवलती देणार असाल तर त्याच स्वागत लक्ष्मण हाके करणार आहे. पण महाज्योतीला जो निधी मिळतो तो सारथीच्या तुलनेत किती मिळतो? आठ लाख कोटी रुपयांच्या बजेटमध्ये ५०% हुन अधिक जास्त लोकसंख्येला म्हणजे ओबीसीला अर्ध्या टक्क्याची बजेटची तरतूद असावी. फडणवीस साहेब तुम्ही १२-१३ कोटी जनतेचे मुख्यमंत्री आहात, परंतु ओबीसींच्या मागण्यांना वाटाण्याच्या अक्षता मिळाल्यात. मराठा समाजाच्या वेगवेगळ्या मागण्यांना तुम्ही रेड कार्पेट आजही घालता. आम्हाला आजही तुम्ही सापत्न वागणूक देत आहेत. आजही तुम्ही एससी एसटी आणि ओबीसी बांधवांवर अन्याय करत आहात, तुमच्या धोरणाचा आम्ही जाहीर निषेध करतो,” अश्या शब्दांत त्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांवर टीका केली.
राज्य सरकारचा मोठा निर्णय! मराठा समाजासाठी आठ नव्या योजना, ओबीसींप्रमाणे शैक्षणिक सवलती मिळणार






