मध्य रेल्वेच्या १० स्थानकांवर सुरू होणार 'आपत्कालीन वैद्यकीय कक्ष' (Photo Credit- X)
मुंबईच्या उपनगरी रेल्वे मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कसारा, खोपोली आणि कर्जत या मार्गांवर सुमारे ९० रेल्वे स्थानके आहेत. मात्र, यापैकी केवळ चार स्थानकांवरच वैद्यकीय सुविधा उपलब्ध असल्यामुळे अपघातग्रस्त प्रवाशांना वेळेवर उपचार मिळत नसल्याची गंभीर बाब समोर आली होती. अनेकदा जखमी प्रवाशांना रुग्णालयात नेण्यापूर्वीच उपचाराअभावी जीव गमवावा लागत असल्याने या प्रश्नावर खा. संजय दिना पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. यासंदर्भात त्यांनी मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना पत्र पाठवून प्रशासनाच्या निष्क्रियतेवर बोट ठेवले होते.
तसेच केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी झालेल्या बैठकीत प्रत्येक स्थानकावर किमान प्राथमिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी ठामपणे मांडली होती. ‘गोल्डन अवर’मध्ये जखमींना तात्काळ उपचार मिळणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. त्यांनी मांडलेल्या मागण्यांमध्ये प्रत्येक स्थानकावर ऑक्सिजन, स्ट्रेचर, आवश्यक औषधे, बेसिक लाईफ सपोर्ट सुविधा उपलब्ध करणे, प्राथमिक उपचार पेट्या ठेवणे, तसेच स्टेशन मास्टर, टीसी आणि रेल्वे कर्मचाऱ्यांना आपत्कालीन वैद्यकीय प्रशिक्षण देणे यांचा समावेश आहे.
पूर्वी मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर यांसारख्या स्थानकांवर आपत्कालीन वैद्यकीय कक्ष कार्यरत होते. मात्र गेल्या वर्षभरात या सुविधा बंद झाल्याने प्रवाशांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. याच पार्श्वभूमीवर खा. पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा करत हा मुद्दा केंद्र सरकारसमोर मांडला. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले असून आता कुर्ला, लोकमान्य टिळक टर्मिनस, चेंबूर, मानखुर्द, घाटकोपर, ठाणे, मुंब्रा, टिटवाळा आणि कर्जत या स्थानकांवर टप्प्याटप्प्याने आपत्कालीन वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. या निर्णयामुळे दररोज लाखो प्रवाशांची ‘जीवनवाहिनी’ असलेल्या मुंबई उपनगरी रेल्वेमध्ये प्रवास अधिक सुरक्षित होणार असून अपघातग्रस्तांना तात्काळ उपचार मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त करत खा. संजय दिना पाटील यांनी सांगितले की, ही केवळ सुरुवात असून पुढील काळात सर्व रेल्वे स्थानकांवर अशा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मी प्रयत्न सुरू ठेवणार आहे. तसेच प्रत्येक स्थानकाबाहेर रुग्णवाहिका सेवा उपलब्ध व्हावी यासाठीही पाठपुरावा केला जाईल. दरम्यान, प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने घेतलेला हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात असून, रेल्वे प्रशासनावर टीका करणाऱ्या मुद्द्यांनंतर आता सकारात्मक पाऊल उचलले गेले असल्याचे स्पष्ट होत आहे.






