कशेडी घाटात दरड कोसळली! महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम; मुंबईच्या दिशेने जाणारी एक लेन पूर्णतः बंद
दरड कोसळण्याची घटना समजताच पोलादपूर पोलीस व कशेडी पोलीस यांच्यासह पोलादपूर तहसीलदार कपिल घोरपडे महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदरावडे यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी जागेत वाहतूक सुरळीत करण्यासाठी मेहनत घेतली. या घटनेची माहिती समजताच महाडचे उपविभागीय अधिकारी पोपट ओमासे यांनीही घटनास्थळी धाव घेत महसूल अधिकारी कर्मचारी यांना मार्गदर्शन व सूचना केल्या आहेत. दरम्यान पावसाळ्याचे दिवस असले तरी गेले आठ दिवस पावसाने दांडी मारून उघडीप दिली असून दरड कोसळल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे
तसेच मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरण कामात ठेकेदार व संबंधित महामार्ग प्रशासन बांधकाम विभाग यांनी कशेडी घाटातील भौगोलिक परिस्थिती लक्षात न घेता डोंगर उभे कापल्यामुळे या वारंवार होणाऱ्या घटनांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे भविष्यात एखादी दुर्दैवी घटना घडल्यास याला जबाबदार कोण असा प्रश्न या विभागातील स्थानिक नागरिक आणि प्रवासी जनतेकडून व्यक्त केला जात आहे. रात्रीची वेळ असली तरी तहसीलदार कपिल घोरपडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद रावडे यांच्यासह पोलादपूर पोलीस, कशेडी महामार्ग पोलीस मदत केंद्राचे पोलीस कर्मचारी व एमआयडीसी पोलीस घटनास्थळी दाखल असून जागता पहारा देत असून वाहतूक सुरळीत सुरू ठेवण्याचा पोलिसांचा प्रयत्न दिसून आला आहे.
वारंवार दरडी कोसळण्याच्या आणि जमिनीला भेगा पडण्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई गोवा महामार्ग रुंदीकरण आणि चौपदरीकरण झाले पाहिजे ही प्रामुख्याने कोकणातील पत्रकारांची भूमिका होती. मात्र चौपदरीकरण कामात रस्त्याची आधीची वळणे कमी न करता डोंगर माथ्यामध्ये घाटातील डोंगर उभे कापल्याने त्याचा परिणाम कधी ना कधी हे डोंगर सातत्याने खाली कोसळतील हे यापूर्वीच दिसून येत होते
तसेच अतिवृष्टी दरडी कोसळणे जमिनीला भेगा पडणे, संपूर्ण रायगड जिल्ह्यासह कोकणात जिथे जिथे बांधकाम खात्याने छेद दिला तिथे दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढले आहे. मातीचे होणारे उत्खनन, खोदकामात होणारे ब्लास्टिंग यामुळे पावसाळ्यात पडणारे पाणी आणि त्यातून डोंगर भागात निर्माण होणारा ओलावा त्यामुळेही भेगा अधिक पडण्याचे प्रमाण आणि जमीला तडे जाण्याचे प्रमाण दिसून येत आहे, अशी भावना पत्रकारांसह स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली.
कोकणातील आंबेनळी घाट, कशेडी घाट, वरंधघाट अशा घाटमाथ्यावर होणाऱ्या ह्या दुर्घटना टाळण्यासाठी बांधकाम विभाग प्रशासन यांनी भूगर्भ शास्त्रज्ञांची मदत घेऊन या गोष्टीवर काही उपाययोजना करता येतील का? याचा अभ्यास करणे गरजेचे बनले आहे. गेल्या पंधरा-वीस दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे अतिवृष्टी सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने ताम्हणी घाट, भोर घाट, आंबेनळी घाट या तीनही घाट मार्गावरील एसटी वाहतूक बंद असल्याने पुणे सह पश्चिम महाराष्ट्राला जोडणारे मार्ग बंद असल्याने प्रवासी जनतेला याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
गेली अनेक दिवस वाहतूक बंद असल्याने एसटी महामंडळालाही याचा मोठा फटका बसला आहे. यासाठी पावसाळ्यादरम्यान वारंवार होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी महामार्ग प्रशासन, राज्यमार्ग प्रशासन, बांधकाम विभाग आणि जिल्हा प्रशासन यांनी समन्वय साधून यावर मार्ग काढणे गरजेचे बनले आहे.






