'पेट्रोलचे दर प्रतिलिटर 170 तर डिझेलचे 150 रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता'; 'या' बड्या नेत्याने व्यक्त केली चिंता (संग्रहित फोटो)
नागपूर : देशातील जनता महागाई, बेरोजगारी, इंधन दरवाढ आणि आर्थिक अस्थिरतेने त्रस्त असताना केंद्रातील सरकार धार्मिक ध्रुवीकरण आणि इव्हेंटबाजीच्या माध्यमातून अपयश लपवण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
अनेक ठिकाणी वाहनांचे आरसी बुक पाहून डिझेल दिले जात आहे. शेतकऱ्यांना डिझेलची गरज असताना अशी परिस्थिती निर्माण होणे गंभीर बाब आहे. काही दिवसांत देशात लॉकडाऊनसारखी स्थिती निर्माण होऊ शकते. नजीकच्या काळात पेट्रोलचे दर प्रतिलिटर १७० रुपये आणि डिझेलचे दर १५० रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. मध्यमवर्गीय, शेतकरी आणि सामान्यांवर मोठा आर्थिक भार पडणार असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले.
दरम्यान, पेट्रोल-डिझेल दरवाढ, शेतकऱ्यांच्या समस्या आणि बेरोजगारीसारख्या मूलभूत प्रश्नांवरून जनतेचे लक्ष हटवण्यासाठी भाजप हिंदू-मुस्लिम वाद निर्माण करून समाजात धार्मिक तेढ पसरवत आहे. सरकारकडे जनतेला दिलासा देण्यासाठी कोणतीही ठोस योजना उरलेली नाही. मनोज जरांगे पाटील सातत्याने आंदोलन करत असतानाही सरकारकडून केवळ आश्वासनांची धूळफेक केली जात आहे. शासनाकडून जीआर काढले जातात. मात्र, त्यांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याची टीकाही वडेट्टीवार यांनी केली.
नीटसाठी मोफत प्रवास व्यवस्था करा
पंजाब, हरियाणा आणि बिहार या राज्यांनी नीट परीक्षार्थींसाठी मोफत बससेवेचा निर्णय घेत विद्यार्थ्यांप्रती संवेदनशीलता दाखवली आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्र सरकारनेही २१ जूनला राज्यातील नीट पुनर्परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एसटी महामंडळाच्या बससेवा, महापालिका परिवहन सेवा तसेच मेट्रो प्रवास विनामूल्य करण्याचा निर्णय घ्यावा. केंद्र सरकारनेही विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी रेल्वे प्रवासात विशेष सवलत किंवा मोफत प्रवासाची व्यवस्था करण्याचा सकारात्मक विचार करावा, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.\
जागावाटपात कार्यकर्त्यांच्या भावनांचा विचार करा
ध्रुवीकरण केल्याशिवाय भाजपला राजकारणात यश मिळत नाही. अशी टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. जागा वाटप करताना कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करावा असे मत व्यक्त करत त्यांनी राज्यातील विविध राजकीय मुद्द्यांवर भाष्य केले आहे.






