पुणे विषारी दारू प्रकरणावरून सुप्रिया सुळे यांचं मोठं विधान
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात केमिकलयुक्त विषारी गावठी दारू प्यायल्याने तब्बल १८ जणांचा मृत्यू झाल्याची धक्काफायक बातमी समोर आली असून, यामुळे संपूर्ण राज्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. हडपसर येथील काळेपडळ येथे तयार झालेल्या या ‘विषारी दारूमुळे अनेकांना प्राण गमवावे लागले असून या घटनेमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. या भीषण दुर्घटनेनंतर परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. अश्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी यावरून मोठे विधान करत ‘तरुण पिढीला नशेचा विळखा पडला असून सुसंस्कृत, पुरोगामी महाराष्ट्राची ‘उडता महाराष्ट्र’ कडे वाटचाल सुरु आहे काय?’ असा सवाल उपस्थित केला आहे. तसेच, बेकायदा विषारी दारुचा एवढा मोठा व्यापार सुरु होता. याबाबत वेळीच कारवाई केली असती तर हे जीव वाचले असते. कुटुंबे उद्ध्वस्त झाली नसती, अश्या भावना त्यांनी व्यक्त केल्या.
सुप्रिया सुळे यांनी आपल्या अधिकृत ‘X’ अकाऊंटवरून याबाबत भाष्य केले. त्या म्हणाल्या, “पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड परिसरात विषारी दारु पिल्यामुळे मोठी जिवितहानी झाल्याची घटना अतिशय गंभीर आहे. शहरात पुणे पोलीसांच्या नाकाखाली बेकायदा विषारी दारुचा एवढा मोठा व्यापार सुरु होता. याबाबत वेळीच कारवाई केली असती तर हे जीव वाचले असते. कुटुंबे उद्ध्वस्त झाली नसती. केवळ दारुच नाही तर ड्रग्जसारखी इतरही नशेचे साहित्य पुणे आणि परिसरात राजरोसपणे उपलब्ध होत असल्याचे वारंवार उघडकीस आले आहे. तरुण पिढीला नशेचा विळखा पडला असून सुसंस्कृत, पुरोगामी महाराष्ट्राची ‘उडता महाराष्ट्र’ कडे वाटचाल सुरु आहे काय?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड परिसरात विषारी दारु पिल्यामुळे मोठी जिवितहानी झाल्याची घटना अतिशय गंभीर आहे. शहरात पुणे पोलीसांच्या नाकाखाली बेकायदा विषारी दारुचा एवढा मोठा व्यापार सुरु होता. याबाबत वेळीच कारवाई केली असती तर हे जीव वाचले असते. कुटुंबे उद्ध्वस्त झाली नसती. केवळ… — Supriya Sule (@supriya_sule) May 29, 2026
त्या पुढे म्हणाल्या, “राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जरी या प्रकरणी कुणाची गय केली जाणार नसल्याचे स्पष्ट केले असले तरी या संपूर्ण प्रकरणाची पाळेमुळे खणून काढणे आवश्यक आहे. शहर आणि महाराष्ट्राला पडलेला नशेचा आणि विषाचा हा विळखा सुटलाच पाहिजे, यासाठी गृहखात्याने अधिकाधिक सजगतेने, पारदर्शक पद्धतीने कठोर कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे,” असे त्या म्हणाल्या.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत माध्यमांना प्रतिक्रिया दिल्या. ते म्हणाले, “माझे पुणे पोलीस आयुक्तांशी बोलणे झाले आहे. विषारी दारू कुठे तयार झाली ते शोधून काढले आहे. आतापर्यंत आठ लोकांना अटक झाली आहे. अजून काही लोकांना अटक होऊ शकते. या प्रकरणातील संपूर्ण साखळी शोधून त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल,” असे ते म्हणाले.
हडपसर येथील काळेपडळ येथे अत्यंत सराईत गुन्हेगार योगेश वानखेडे हा या विषारी दारूचा अड्डा चालवत होता. त्याने केमिकलयुक्त स्पिरिटचा वापर करून ही विषारी दारू तयार केली होती. ही दारू त्याने हडपसर आणि फुगेवाडी येथील अवैध अड्ड्यांवर पुरवली. ही दारू प्यायल्यानंतर नागरिकांना तीव्र उलट्या, पोटदुखी आणि डोळ्यांसमोर अंधारी येण्याचा त्रास सुरू झाला. काही तासांतच एकापाठोपाठ एक अशा १८जणांचा मृत्यू झाला.योगेश वानखेडे हा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या (Excise Department) रेकॉर्डवरील अत्यंत सराईत गुन्हेगार आहे. या घटनेमुळे दारू बनवत असलेल्या ठिकाणचे पोलीस प्रशासन आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार वानखेडे प्रशासनाच्या डोळ्यांदेखत एवढा मोठा विषारी दारूचा अड्डा चालवतोच कसा? केमिकल स्पिरिटचा बेकायदेशीर पुरवठा त्याच्यापर्यंत पोहोचतोच कसा? असे संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.






