मुंबई–हैदराबाद बुलेट ट्रेन बारामतीतून धावणार (Photo Credit- X)
सुमारे पाच वर्षांपूर्वी या प्रकल्पाच्या प्राथमिक आराखड्याच्या अनुषंगाने संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी बारामतीमध्ये विविध क्षेत्रातील नागरिक, शेतकरी व लोकप्रतिनिधींची बैठक घेतली होती. त्यावेळी प्रकल्पाबाबत सूचना आणि हरकती मागविण्यात आल्या होत्या. अनेक शेतकऱ्यांनी बागायती व ऊस पट्ट्यातून बुलेट ट्रेनचा मार्ग नेऊ नये, अशी भूमिका मांडत शेतीचे होणारे नुकसान टाळण्याची मागणी केली होती.
मात्र हा प्रकल्प केंद्र सरकारच्या प्राधान्यक्रमातील असल्याने त्याची अंमलबजावणी पुढे नेण्याच्या हालचालींना वेग आला आहे. प्रस्तावित मार्गानुसार मुंबईनंतर पुणे, बारामती, पंढरपूर आणि पुढे हैदराबाद अशी प्रमुख स्थानके असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर बारामतीहून मुंबई किंवा हैदराबाद येथे अवघ्या अडीच ते तीन तासांत पोहोचणे शक्य होणार आहे.
या प्रकल्पाच्या कामा संदर्भात संबंधित यंत्रणेने मार्किंग देखील केले आहे. प्रकल्पाचे बांधकाम सुरू झाल्यानंतर सुमारे दहा वर्षांत काम पूर्ण होण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. या प्रकल्पासंदर्भात संबंधित विभागाकडून भूसंपादनाबाबत अधिकृत अधिसूचना येत्या काही दिवसात जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान, बारामती–फलटण रेल्वेमार्गाचे काम सध्या वेगाने सुरू आहे. संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग अंतिम टप्प्यात असून, नगर–बारामती–फलटण–दहिवडी–चिकोडी राष्ट्रीय महामार्गाचे कामही युद्धपातळीवर सुरू आहे. याशिवाय प्रस्तावित पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पालाही लवकरच प्रत्यक्ष प्रारंभ होण्याची अपेक्षा आहे.
रेल्वे, राष्ट्रीय महामार्ग, विमानतळ आणि आता बुलेट ट्रेन अशा चारही महत्त्वाच्या वाहतूक सुविधांचा संगम झाल्यास बारामती राज्यातील एक महत्त्वाचे दळणवळण व औद्योगिक केंद्र म्हणून उदयास येईल. उद्योग, व्यापार, लॉजिस्टिक्स, पर्यटन आणि सेवा क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आकर्षित होण्याची शक्यता असून, आगामी काळात बारामतीच्या आर्थिक उलाढालीत लक्षणीय वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.






