शालेय विद्यार्थ्यांच्या दप्तराचा अतिरिक्त भार होणार आता कमी; शिक्षण विभागाकडून कडक सूचना जारी (फोटो सौजन्य - iStock)
नागपूर : शहर आणि आसपासच्या परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामान खात्याने पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यात ‘ऑरेंज अलर्ट’ही जारी केला आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून नागपूर जिल्हा प्रशासनाने बुधवारी (दि.२९) शासकीय आणि खाजगी शैक्षणिक संस्थांना एक दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे.
भारतीय हवामान खात्याने २८ ते ३० जुलै दरम्यान जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा (अतिवृष्टीचा) ‘ऑरेंज अलर्ट’ इशारा जारी केला आहे. मंगळवारी दुपारी २.३० वाजेपर्यंत शहरात १०८.१ मिमी पावसाची नोंद झाली तर सायंकाळी ५.३० पर्यंत १७९.६ मिमी पावसाची नोंद केली. मुसळधार पावसामुळे जिल्ह्याच्या अनेक भागांमध्ये पाणी साचले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, २९ जुलैला होणाऱ्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्याच्या अनेक भागांमध्ये अचानक पूर येण्याची दाट शक्यता आहे.
दरम्यान, संभाव्य आपत्कालीन परिस्थितीमुळे आणि मुसळधार पावसामुळे कोणतीही अनुचित घटना टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना केल्या आहेत. आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ च्या कलम ३० आणि ३४ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून जिल्हाधिकारी आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष कुमार आशीर्वाद यांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने २९ जुलैला अधिकृत सुट्टीचा आदेश जारी केला आहे.
नागपूर ग्रामीण, कामठीमध्ये बंदचा आदेश लागू
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, ही सुट्टी नागपूर शहरात (नागपूर महानगरपालिका क्षेत्रासह) आणि नागपूर ग्रामीण, हिंगणा व कामठी या लगतच्या तालुक्यांमध्ये लागू राहील. या भागांतील सर्व शासकीय आणि खाजगी अंगणवाड्या, प्राथमिक व माध्यमिक शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग क्लासेस बुधवारी पूर्णपणे बंद राहतील.
व्यवस्थापन पथके सतर्क
प्रशासनाने सांगितले की, हा आदेश नागपूर विभागीय आयुक्त, महानगरपालिका आयुक्त, पोलिस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी (जिल्हा परिषद) आणि शिक्षणाधिकाऱ्यांसह संबंधित विभागांना माहितीसाठी आणि तत्काळ कारवाईसाठी पाठवला आहे. प्रशासन परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहे आणि कोणतीही संभाव्य परिस्थिती हाताळण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन पथकांना सतर्क ठेवले आहे. हवामानाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनाही सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
Nagpur मध्ये सुटकेचा थरार ! ८०० विद्यार्थी तीन-चार फूट पाण्यात अडकले; मानवी साखळी करत…, पहा Video






