उन्हाळ्यात भासणार १०७५ गावांना टंचाई, पाण्यासाठी टँकरवरच राहणार भर
Nashik Water Issue News Marathi: नाशिक जिल्ह्यातील धरणांमध्ये फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात सुमारे ७७ टक्के जलसाठा उपलब्ध असतांना जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने यंदा ४२३ गावे व ६५२ वाड्यांना पाणी टंचाईची झळ बसणार असल्याचा अंदाज बांधून सुमारे ७ कोटी ३८ लाखाचा आराखडा सादर केला आहे. यंदाही प्रशासनाचा टँकरवरच भर देण्यात आला असून, त्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. जिल्हा प्रशासनाकडे दाखल झालेला संभाव्य ‘टंचाई निवारण आराखडा’ अंतिम मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. जिल्ह्यातील धरणांचा साठा आणि भूजल पातळीचा विचार करून यावर्षीचा आराखडा तयार करण्यात आला आहे.या आराखड्यानुसार जिल्ह्यात ४२३ गावे आणि ६५२ वाड्यांवर दुष्काळाची शक्यता गृहित धरण्यात आली आहे. टंचाई निवारणासाठी ७ कोटी ३८ लाख २६ हजार रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा, येवला, सिन्नर आणि चांदवड यांसारख्या कायम टंचाईग्रस्त तालुक्यांवर प्रशासनाने विशेष लक्ष केंद्रित केले आहे. पाणीटंचाई भासणाऱ्या गावांमध्ये खासगी विहिरी अधिग्रहित करून गावकऱ्यांना पाण्याची कमतरता भासू नये, यासाठी नियोजन करण्यात आले आहे. उन्हाळ्याची तीव्रता वाढल्यास किती टँकर लागतील, याचे तालुकानिहाय सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे.
गेल्या वर्षी जवळपास सात ते आठ महिने पाऊस सुरू होता. त्यामुळे जिल्ह्यात पाणीसाठा मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्याने पहिल्या टप्प्यातील तीन महिन्यात कुठेही पाणीटंचाई भासणार नसल्याचे आराखड्यात नमूद करण्यात आले आहे. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात जिल्ह्यात पाणीटंचाईची शक्यता लक्षात घेऊन १६० गावे आणि ६४ वाड्यांवर खासगी विहिरी अधिग्रहित कराव्या लागतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या गावे आणि वाड्यांवर पाणीपुरवठा करण्यासाठी १६२ टैंकर लागतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला असून, त्यानुसार नियोजन करण्यात आले आहे. प्रशासनाने खासगी विहिरी अधिग्रहित करण्यावर भर दिला असून, त्यामुळे परिसरात पाणीपुरवठा करणे सोयीचे होणार आहे.
फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यातच जिल्ह्यातील धरणांतील जलसाठा पटण्यास सुरूवात झाली असून, शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापुर धरणात ६९ टक्के जलसाठा शिल्लक राहिला आहे. आगामी काळात उन्हाचा तडाखा व पाण्याचा वापर वाढल्यास धरणातील पाणी खालावण्यास झपाट्याने सुरूवात होणार आहे. यंदा पावसाळ्यात वरूण राजाचे मे महिन्यापासूनच मान्सूनपुर्व बरसण्यास सुरूवात झाली. पावसाळ्यातील चारही महिने मुक्काम ठोकून ऑक्टोंबर, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत आपली हजेरी ठेवली. परिणामी सप्टेंबरमध्येच जिल्ह्यातील धरणे, तलाव, जलाशये काठोकाठ भरल्याने मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करावा लागला. सलग तीन महिन्यांहून अधिक काळ नद्या, नालेही दुथडी भरून वाहिले. शिवाय भुजल पातळीही वाढली व विहीरींही काठोकाठ भरल्या.
त्यामुळे उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणार नसल्याचे सांगण्यात येत. असले तरी, रब्बीचे आवर्तन, विविध नळपाणी पुरवठा योजनांसाठी करावे लागलेले वाढीव आरक्षणाचा विचार करता, गेल्या दोन महिन्यात धरणसाठ्यात २५ टक्के कमतरता आली आहे. जिल्ह्यातील धरणांमध्ये ५३ हजार ६६३ दशलक्ष घनफूट म्हणजेच ७५.९९ टक्के पाणी सध्या शिल्लक आहे. यात शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापुर धरणात ६९ टक्के तर गंगापुर धरण समुहात ७७.८४ टक्के इतका जलसाठा आहे. पालखेड, भोजापूर ही धरणे पंधरा टक्क्यांवर आली आहेत. तर कडव्यात ५७ टक्के इतकेच पाणी शिल्लक आहे.
टंचाई आराखड्यात दुसऱ्या टप्प्यात महणजेच जानेवारी ते मार्च यादरम्यान ५१ गावे आणि १४ वाड्यांवर खासगी विहीर अधिग्रहित करण्यात येण्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे तर ७९ गावे आणि १३० वाड्यांवर टँकरने पाणीपुरवठा करावा लागेल, असा अंदाज असून, यासाठी एकूण १ कोटी ३९ लाख ७९ हजार रुपये खर्च येण्याची शक्यता आहे.
सध्या धरणातील पाण्यावर सिंचन व पिण्यासाठीचे आरक्षण असून, साधारणतः उन्हाचा तडाखा वाढल्यानंतर पाण्याची मागणी वाढते. त्याचा विचार करून जुन महिना अखेरीस पर्यंत तरी पाण्याची टंचाई भासणार नाही मात्र पाऊस लांबल्यास विचार करावा लागेल असे जलसंपदा विभागाच्या अधिका-यांचे म्हणणे आहे.
Nagpur: आगीत पेपर कंपनी खाक; सात तासांच्या प्रयत्नांनंतर मिळाले नियंत्रण






