पालकमंत्रीपदाचा तिढा कायम; मध्यरात्री झळकले भुजबळ समर्थकांचे फलक, दुपारपर्यंत हटविण्याचे आदेश (फोटो सौजन्य-ChatGPT)
Nashik Politics News Marathi : गेल्या दोन वर्षापासून अडकलेला नाशिकचा (Nashik Politics) पालकमंत्रीपदाचा तिढा अजुनही सुटत नसतांना राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसने सध्या गाजत असलेल्या शहरातील खड्यांच्या आड ‘भुजबळ साहेबांना पालकमंत्री करा’ अशा आशयाचे मुख्यमंत्र्यांना आर्जव करणारे फलक शहरात लावल्याने राजकीय चर्चेला उधाण आले. मध्यरात्री लावलेल्या या फलकांनी शहरवासियांचे लक्ष वेधून घेतलेले असतांनाच मंत्री भुजबळ यांच्या आदेशान्वये दुपारी सदरचे फलक पुन्हा जमीनीवर आले आहेत.
दरम्यान, नाशिकचा पालकमंत्रीपदाचा वाद पुन्हा उफाळून आला असून, या पदावर महायुतीच्या तिन्हीही पक्षांनी दावा सांगितल्यामुळे पालकमंत्री अभावी जिल्ह्याचा कारभार हाकला जात आहे. तर नाशिकच्या या वादाचे थेट राज्यस्तरावर पडसाद उमटून खासदार संजय राऊत (Sanjay raut) यांनी, ‘मुख्यमंत्र्यांनी नाशिककरांच्या भावनेचा आदर करावा’ असे आवाहन केले तर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी, ‘नाशिकचे खड्डे हे राज्य सरकारची सामुहिक जबाबदारी’ असे म्हणत मंत्री गिरीष महाजन यांची पाठराखण केली आहे.
शहरात सर्वत्र पडलेले खड्डे व त्यातून पाच जणांचे बळी गेल्याने संपूर्ण शहरवासिय संतप्त झाले आहेत. या खड्ड्यांना नाशिक महापालिकाच जबाबदार असल्याची तीव्र प्रतिक्रिया मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी दोनच दिवसांपूर्वी व्यक्त केली होती व कुंभमेळामंत्री गिरीष महाजन, मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी रस्त्यावर उतरून खड्यांकडे लक्ष द्यावे अशी सूचना केली होती.
त्याला अनुषंगाने राष्ट्रवादीने शहरातील खड्यांच्या प्रश्नावर आंदोलनही सुरू केले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसने शहरभर फलक लावून नवीन वादाला तोड फोडले. ‘दत्तक नाशिकचे पालक, मुख्यमंत्री फडणवीस साहेब, भुजबळ साहेबांना पालकमंत्री करून नाशिकला खड्डुचापासून बाहेर काढा, सर्वसामान्य नाशिककरांच्या भावना’ असा मजकूर असलेले फलक लावल्याने सोमवारी सकाळी चर्चेचा विषय बनला. अनेकांनी या मागणीचे समर्थन केले असले तरी, त्यावरून राजकीय वाद सुरू होत असल्याचे पाहून मंत्री भुजबळ यांच्या सुचनेवरून दुपारी हे सर्व फलक हटविण्यात आले आहेत.
गेल्या दोन वर्षांपासून महायुतीतील रस्सीखेचमुळे नाशिक व रायगड या दोन जिल्ह्यांचा पालकमंत्रीपदाचा तिढा सुटलेला नाही. भाजपाचे गिरीष महाजन यांना पालकमंत्री करा असा भाजपाचा आग्रह आहे तर शिंदे सेनेचे मंत्री दादा भुसे यांच्यासाठी आग्रही आहे. अशातच महायुतीत सहभागी झालेल्या राष्ट्रवादीने ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांचे नाव लावून धरले आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठींसमोर पेच निर्माण झाल्याने पालकमंत्रीपद रिक्त ठेवण्यात आले. त्या बदल्यात महाजन यांना कुंभमेळामंत्रीपद देवून नाशिकची जबाबदारी देण्यात आली. ध्वजारोहणाचा मानही त्यांनाच मिळतो. अशावेळी राष्ट्रवादीने पुन्हा भुजबळांसाठी सूर आळवल्याने वादाची ठिणगी पडली आहे.
शहरातील प्रश्नावर राष्ट्रवादीने आंदोलन करून लक्ष वेधले आहे. अनेक संस्था, संघटनांनी भुजबळ यांना पालकमंत्री करावे अशी उघड मागणी जाहीरपणे केली आहे. जनभावनेचा भाग म्हणून फलक लावण्यात आले होते. त्यात राजकारण नव्हते. परंतु त्यातून राजकीय अर्थ काढला गेल्याने हे फलक काढण्यात आले,अशी प्रतिक्रिया युकों शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी दिली.






