PCMC News: स्वीकृत सदस्यांसाठी भाजपमध्ये 'तारीख पे तारीख'; आमदार समर्थकांच्या स्पर्धेत निष्ठावंतांची कोंडी?
राज्य शासनाच्या नियमानुसार, १२८ नगरसेवकांच्या सभागृहात प्रति १२.८ नगरसेवकांमागे एक याप्रमाणे १० स्वीकृत सदस्यांची नियुक्ती होणार आहे. यामध्ये:
भाजप: ८४ निवडून आलेले + १ अपक्ष अशा ८५ नगरसेवकांच्या जोरावर ७ जागा भाजपच्या वाट्याला आल्या आहेत.
राष्ट्रवादी: ३७ नगरसेवकांच्या बळावर ३ जागा मिळाल्या आहेत.
शिवसेना: केवळ ६ सदस्य असल्याने तांत्रिकदृष्ट्या शिवसेनेला या प्रक्रियेतून बाहेर राहावे लागले आहे.
सभागृहात भाजपच्या बहुमताला रोखण्यासाठी राष्ट्रवादीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. भाजपच्या कारभारावर सातत्याने ताशेरे ओढणाऱ्या माजी नगरसेविका सीमा सावळे यांना राष्ट्रवादीने संधी दिली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि युवा नेते पार्थ पवार यांनी सावळेंच्या नावाला पसंती दिली असून, त्यांच्यासोबत फजल शेख आणि राजेंद्र जगताप यांची नावे आयुक्तांकडे सादर करण्यात आली आहेत. शुक्रवारी (दि. १३) होणाऱ्या सर्वसाधारण सभेत या नावांवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
भाजपमध्ये ७ जागांसाठी सुरुवातीला ४०० अर्ज आले होते, त्यातील छाननीनंतर १३० नावांची यादी कोअर कमिटीने वरिष्ठांकडे पाठवली आहे. शहरात आमदार महेश लांडगे, आमदार शंकर जगताप, विधान परिषद सदस्य अमित गोरखे, उमा खापरे आणि शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे असे विविध गट सक्रिय आहेत. प्रत्येक गटाने आपल्या समर्थकांसाठी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. दुसरीकडे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि हिंदुत्ववादी संघटनांनीही निष्ठावंतांच्या नावासाठी दबाव वाढवला आहे.
स्वीकृत नगरसेवक पदासाठी मोठ्या प्रमाणावर अर्ज आले आहेत. ही यादी वरिष्ठ नेत्यांकडे पाठवण्यात आली असून, चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाईल. पक्षश्रेष्ठींचा आदेश येताच नावे आयुक्तांकडे सादर केली जातील.
— प्रशांत शितोळे, पक्षनेते, महापालिका
पुणे महापालिकेने स्वीकृत सदस्यांची यादी जाहीर करताना नातेवाइकांना आणि पराभूत उमेदवारांना संधी न देण्याचा नियम पाळला आहे. पिंपरी-चिंचवडमध्येही हाच ‘पुणे पॅटर्न’ राबवला जाण्याची शक्यता असल्याने अनेक बड्या नेत्यांच्या समर्थकांचे धाबे दणाणले आहेत. तज्ज्ञ व्यक्तींच्या नियुक्तीऐवजी कार्यकर्त्यांच्या पुनर्वसनासाठी या जागांचा वापर होत असल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात रंगली आहे. आता शुक्रवारी होणाऱ्या सभेपूर्वी भाजप कोणाच्या गळ्यात माळ घालणार, की पेच कायम राहणार, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.






