पुणेकरांना दिलासा नाहीच ! 15 जुलैपासून पुन्हा दिवसाआड पाणीपुरवठा
पुणे : पुण्यात पाणी प्रश्न गंभीर बनताना दिसत आहे. त्यामुळे पुणे शहर आणि परिसरात दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात आला आहे. मात्र, आषाढी वारीनिमित्त पुणे महापालिका प्रशासनाने ही पाणी कपात मागे घेतली होती. पण, आता शहरातील पाणीसाठ्याची स्थिती आणि खडकवासला धरणसाखळीतील अपेक्षेपेक्षा कमी झालेली पाण्याची आवक लक्षात घेता पुणे महापालिकेने १५ जुलैपासून शहरात पुन्हा दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे.
महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी सोमवारी ही माहिती दिली. पावसाळा सुरू होऊनही धरणक्षेत्रात सातत्याने समाधानकारक पाऊस होत नसल्याने आणि पुढील काही महिन्यांचा पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी उपलब्ध पाणीसाठ्याचे काटेकोर नियोजन आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महापालिकेने यापूर्वी शहरात दिवसाआड पाणीपुरवठा लागू करण्याचा निर्णय जाहीर केला होता. मात्र, आषाढी वारीसाठी लाखो वारकरी पुण्यात दाखल होणार असल्याने त्यांना पाण्याची कोणतीही अडचण निर्माण होऊ नये. तसेच शहरातील नागरिकांनाही गैरसोय होऊ नये, या उद्देशाने हा निर्णय तात्पुरता स्थगित करण्यात आला होता. त्या काळात महापालिकेने वारकऱ्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी अतिरिक्त पाणीपुरवठ्याची व्यवस्था केली होती.
महापालिका प्रशासनाच्या माहितीनुसार, पावसाचा हंगाम अद्याप संपलेला नसला तरी केवळ पुढील पावसाच्या अंदाजावर अवलंबून राहणे धोकादायक ठरू शकते. शहराची वाढती लोकसंख्या, वाढती पाण्याची मागणी आणि पुढील उन्हाळ्यापर्यंत पुरेल इतका पाणीसाठा राखून ठेवण्याची गरज लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. पावसाने पुन्हा जोर धरल्यास परिस्थितीचा वेळोवेळी आढावा घेऊन आवश्यक ते बदल केले जातील, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
क्षेत्रनिहाय वेळापत्रक लवकरच जाहीर
दिवसाआड पाणीपुरवठा लागू झाल्यानंतर शहरातील प्रत्येक भागाला एक दिवसाआड पाणी मिळणार असून त्यासाठी क्षेत्रनिहाय वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे. नागरिकांनी आपल्या परिसरातील वेळापत्रकाची माहिती संबंधित क्षेत्रीय कार्यालय, महापालिकेच्या अधिकृत माध्यमांद्वारे किंवा स्थानिक प्रशासनाकडून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. पाणी साठवताना स्वच्छतेची काळजी घ्यावी, आवश्यक तेवढेच पाणी भरून ठेवावे आणि अनावश्यक साठेबाजी टाळावी, असेही प्रशासनाने सांगितले आहे.






