काळजी घ्या ! राज्यात आता 'या' आजाराने काढले डोके वर; आरोग्य यंत्रणा 'अलर्ट'वर
पुणे : सध्या हिवतापानंतर प्लाजमोडियम फाल्सिपॅरॉम हा जीवघेणा प्रकार राज्यासाठी मोठा धोका बनत आहे. गेल्या काही वर्षांतील आकडेवारी पाहता, हिवतापाच्या रुग्णांमध्ये पीएफचे प्रमाण चिंताजनकरित्या वाढत असल्याचे दिसून येते. वेळेत उपचार न झाल्यास हा प्रकार थेट जीवावर बेतू शकतो, असा इशारा तज्ज्ञांकडून देण्यात येत आहे.
राज्यात २०२३ ते २०२५ दरम्यान हिवतापाच्या रुग्णसंख्येत सातत्याने वाढ झाली असल्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाची आकडेवारी सांगते. यातील सर्वात धोकादायक बाब म्हणजे पी. एफ. प्रकाराचे प्रमाण ३९ टक्क्यांवरून ४२ टक्क्यांपर्यंत गेले होते. हा प्रकार सामान्य मलेरियापेक्षा अधिक वेगाने शरीरावर परिणाम करतो. पी. एफ. मलेरियामध्ये रुग्णाची प्रकृती अचानक खालावते. मेंदूवर परिणाम होऊन ‘सेरेब्रल मलेरिया’ होण्याचा धोका असतो. यामुळे बेशुद्धावस्था, झटके येणे तसेच किडनी व लिव्हर निकामी होण्यासारख्या गंभीर गुंतागुंती उद्भवू शकतात. त्यामुळेच हा प्रकार ‘सायलेंट किलर’ म्हणून ओळखला जातो.
दरम्यान, २०२६ मध्ये २१ एप्रिलपर्यंत २७२० हिवताप रुग्ण नोंदले गेले असून, त्यापैकी ६३४ रुग्ण पी.एफ. प्रकाराचे आहेत. सध्या मृत्यू शून्य असले तरी धोका टळलेला नसल्याचेच समोर येत आहे.
सहा जिल्ह्यात हिवतापाचे सर्वाधिक रुग्ण
जिल्हानिहाय पाहता राज्यात सहा जिल्ह्यात हिवतापाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. यात गडचिरोली, रायगड, सिंधुदुर्ग, सातारा, रत्नागिरी आणि चंद्रपूर असे असून शहरी भागातही बृहन्मुंबई, ठाणे, पनवेल, कल्याण, मिराभाईंदर व वसई विरार येथे हिवताप चा प्रभाव दिसून येत आहे. यावरून हा आजार केवळ ग्रामीण मर्यादित नसून शहरांमध्येही वेगाने पसरत असल्याचे स्पष्ट होते.
डासांची पैदास रोखणे महत्त्वाचे
डासांची पैदास रोखल्यास मलेरियावर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळवता येऊ शकते. साचलेले पाणी काढून टाकणे, परिसर स्वच्छ ठेवणे आणि डास नियंत्रणाच्या उपाययोजनांना सहकार्य करणे हे महत्त्वाचे टप्पे आहेत. भविष्यात लसींची भूमिका वाढू शकते. मात्र, सध्या सातत्यपूर्ण प्रतिबंधात्मक उपाय आणि वेळेवर उपचार हेच मलेरियावर मात करण्याचे सर्वात प्रभावी मार्ग आहेत.






