सौजन्य - नवराष्ट्र टीम
पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये विषारी दारू प्रकरणात २३ जणांचा मृत्यू झाल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभाग खडबडून जागा झाला असून, राज्यभरातील अवैध दारू विक्री आणि निर्मिती केंद्रांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत. डॉ. देशमुख यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यातील सर्व उत्पादन शुल्क अधीक्षकांची बैठक घेत परिस्थितीचा आढावा घेतला. ज्या ठिकाणी अवैध मद्यविक्री, निर्मिती किंवा तस्करीची माहिती मिळेल, त्या ठिकाणी तात्काळ छापेमारी करून कठोर कारवाई करण्यात यावी, असे स्पष्ट निर्देश यावेळी त्यांनी दिले.
अवैध दारू अड्ड्यांवर विशेष लक्ष ठेवण्यासोबतच नियमित तपास मोहीम राबविण्याचे आणि दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई सुनिश्चित करण्याचे आदेशही त्यांनी दिले. विषारी दारू प्रकरणानंतर राज्य सरकार आणि उत्पादन शुल्क विभागावर टीकेची झोड उठत असून, त्यानंतर विभागाने कारवाईचा वेग वाढविला आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये विषारी दारू प्राशनामुळे आतापर्यंत २३ जणांचा मृत्यू झाला असून, अनेकांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर प्रशासन आणि पोलीस यंत्रणाही सतर्क झाली आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) सोपविण्यात आला असून, तपासासाठी पाच विशेष पथके स्थापन करण्यात आली आहेत. ही पथके विषारी दारूची पुरवठा साखळी, निर्मिती आणि वितरणाशी संबंधित सर्व बाबींची चौकशी करणार आहेत.
४२ अवैध दारूअड्ड्यांची माहिती समोर
हडपसर परिसरातील अवैध दारू भट्ट्यांवर शिवसेनेने केलेल्या कारवाईनंतर शहरभरातून नागरिक मोठ्या प्रमाणावर अवैध दारू विक्री आणि बनावट दारू निर्मिती केंद्रांची माहिती देत आहेत. शिवसेनेच्या माहितीनुसार, पुणे शहरातील तब्बल ४२ अवैध दारू अड्ड्यांची माहिती समोर आली आहे. शिवसेना पुणे शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी आरोप केला की, हडपसरमधील नऊ अवैध दारू भट्ट्या उद्ध्वस्त झाल्यानंतर नागरिक स्वतः पुढे येऊन माहिती देत आहेत; मात्र पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाला हे अड्डे दिसत नाहीत. या दारू माफियांना नेमके कोणाचे संरक्षण आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
पुरवठा साखळीचाही तपास व्हावा
विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले की, अशा घटना घडल्यानंतर प्रत्येक वेळी विधानसभेत आणि विधान परिषदेत चर्चा होते; मात्र या घटनांची पुनरावृत्ती थांबवण्यासाठी प्रभावी यंत्रणा उभारणे आवश्यक आहे. हे केवळ अवैध हातभट्टी दारूचे प्रकरण नसून, मिथेनॉलसारख्या घातक रसायनांचा पुरवठा नेमका कुठून झाला, याची संपूर्ण साखळी शोधली गेली पाहिजे, असे त्यांनी नमूद केले. रासायनिक तपासणी अहवाल तातडीने जाहीर करून सक्षम सरकारी वकिलाची नियुक्ती करावी आणि फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून दोषींना कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.
सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना केवळ निलंबित करण्याऐवजी त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. अहिर म्हणाले की, गेल्या महिन्यात फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्राशनामुळे तिघांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी पोलिसांनी गांभीर्याने कारवाई केली असती, तर एवढ्या मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली नसती. पोलिसांच्या हलगर्जीपणामुळेच ही घटना अधिक भीषण स्वरूपात गेल्याचा आरोपही त्यांनी केला.






