सौजन्य - नवराष्ट्र टीम
पुणे : पुण्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसादरम्यान वाहतूक पोलिसांच्या तत्परतेमुळे आणि धाडसी बचावकार्यामुळे एका टेम्पो चालकाचा जीव वाचला आहे. बोपोडी अंडरपासमध्ये साचलेल्या पाण्यात टेम्पो घातल्यानंतर टेम्पोसह चालक वाहून जाऊ लागला. पण, समोर असलेल्या पोलिसांनी पाण्यात उतरून त्या चालकाला टेम्पोतून बाहेर काढत दोरीने सुखरूप काठावर आणले. पोलिसांच्या या शौर्याचे सर्व स्तरावर कौतुक होत आहे. सोमवारी दुपारी सुमारे बारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.
वाहतूक शाखेचे पोलिस हवालदार निलेश पुकाळे आणि हवालदार नितीन कारले अशी या घाडसी कामगिरी करणाऱ्या दोघा पोलिसांची नावे आहेत. पुकाळे व कारले हे खडकी वाहतूक विभागात कर्तव्यास आहेत. दरम्यान, रविवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. हा पाऊस सोमवारी देखील सुरूच होता. त्यामुळे ठिकठिकाणी पाणी साचले आहे.
दरम्यान, राहुल पाटोले (टेम्पो क्रमांक एमएच-१२ वायके-४३०४) हे बोपोडी चौकातून आंबेडकर चौकाच्या दिशेने टेम्पो घेऊन जात होते. येथील अंडरपासमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्याठिकाणी काही क्षणांत टेम्पो पाण्यात अडकला आणि वेगवान प्रवाहामुळे वाहू लागला. हे पाहताच वाहतूक शाखेचे हवालदार निलेश पुकाळे आणि हवालदार नितीन कारले यांनी क्षणाचाही विलंब न लावता पाण्यात उडी घेतली. दोघांनी दोरीच्या साहाय्याने चालकापर्यंत पोहोचून त्याला सुखरूप बाहेर काढले. धाडसी कामगिरीबद्दल घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी दोन्ही पोलिस कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. वाहतूक शाखेचे उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
पाटणमध्ये दरड कोसळून तिकोणे कुटुंबातील तिघांचा मृत्यू
मावळ तालुक्यात सोमवारी पहाटेपासून सुरू असलेल्या संततधार मुसळधार पावसाने भीषण रूप धारण केले असून, पाटण गावात घडलेल्या दरड कोसळण्याच्या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण मावळ तालुक्यावर शोककळा पसरली आहे. या दुर्घटनेनंतर मावळ तालुक्यातील सर्व दरडप्रवण गावांचे तातडीने भूगर्भीय सर्वेक्षण करून धोकादायक ठिकाणी राहणाऱ्या कुटुंबांचे सुरक्षितस्थळी पुनर्वसन करावे, तसेच अशा भागांमध्ये कायमस्वरूपी संरक्षणात्मक उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.






