सातवाहनकालीन पाण्याची टाकं
गोमाशीगड ही तशी टेकडी या ठिकाणी जंगलं बऱ्यापैकी आहे. या ठिकाणाची माहिती तशी फार काही प्रचलित नाही. पण स्थानिकांच्या मते फार पुर्वी याठिकाणी शिकार केली जायची. इथे इतिहासकालीन पाण्याच्या टाक्या आहेत. त्यामुळे शिकारी करण्यासाठी येणारी माणसं काही दिवस या जंगलात रहायची देखील. पुरातत्व विभागाच्या म्हणण्यानुसार, ही पाण्याची टाकं सातवाहन काळातील असावी. गेले कित्येक दिवस हा तसा साधासुधा डोंगर होता पण मातीच्या भांड्यांची खापरे, ऐतिहासिक खुणा आणि पाण्याची टाकं या सगळ्यांनी इतिहास संसोधन मंडळाचं लक्ष वेधलं आणि सुरु झाला शोध या डोंगराच्या इतिहासाचा. सध्या मिळालेल्य़ा काही तुटपुंज्या पुराव्यांवर याला गड म्हणावं कि किल्ला असा सध्या संभ्रम सुरु आहे.
या गोमाशीगडाबाबत अशी देखील शक्यता वर्तवण्यात आलं की,छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावेळी इंग्रज अधिकारी हेन्री ऑक्सेंडन हा कोलाड-निजामपूर मार्गे रायगडावर गेला होता. त्यावेळी याच मार्गावर हा किल्ला अस्तित्वात असू शकतो. या डोंगराबाबत असलेल्या रहस्याच्या मुळाशी जाण्याचा निर्धार आनंद सानप आणि त्यांचे सहकारी किशोर सावरकर, सौरभ घरट, दत्तात्रय सावंत, कृष्णाराम जाधव, केतन फुलपगारे यांनी सुरू केला. ही दुर्ग शोध मोहीम सुरुवातीला केवळ अभ्यासापुरतीच होती. मात्र आता याची पाळंमुळं शोधण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.
गोमाशीगडाबाबत आणखी माहिती अशी की इथे जे काही अवशेष मिळाले त्याचा विचार करायचा झाला तर, पुर्वाीच्या या डोंगराचा टेहळणी म्हणजेच एखादं व्यापाऱ्याचं ठाणं देखील असू शकतं असं अभ्यासातून प्रथिमक अंदाज व्यक्त केला जात आहे. साधारणत: इसवी सन 900नंतरच्या काळात या किल्ल्याची निर्मिती झाली असावी, अशी शक्यता आहे, पुरातत्त्व खात्याचे तेजस गर्गे यांच्या म्हणण्यानुसार गोमाशीगड हा पुर्वी गड होता की किल्ला यावर सध्या काही ठोस सांगता येणार नाही. पुर्वीच्या काळी इथे कधी युद्ध झालं होतं का? यासाठी सखोल अभ्यास करण्याची गरज आहे. गोमाशीगडाचा नेमका इतिहास अद्याप पुढे आला नसला तरी दुर्गप्रेमींमध्ये असा एखादा गड अस्तित्वात होता आणि त्याबाबत शोध सुरु असल्याने समाधान व्यक्त केलं जात आहे.






