नेरळला जाणारी एसटी बंद पडल्याने विद्यार्थ्यांचे हाल, पायपीट करून गाठावे लागले परीक्षा केंद्र
कर्जत : सध्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू असून आज दहावीचा संस्कृत पेपर आहे. हा पेपर देण्यासाठी निघालेल्या विद्यार्थ्यांना घेऊन निघालेला एसटी गाडी मध्ये बिघाड झाल्याने विद्यार्थ्यांचे हाल झाले. कळंबयेथून नेरळ कडे येत असलेल्या एसटी गाडीला पोशीर जवळ हा बिघाड झाला आणि नंतर विद्यार्थ्यांना पायपीट करून परीक्षा केंद्र गाठावे लागले.
सकाळची वेळ शक्यतो आपल्या निश्चित ठिकाणी नोकरीचे ठिकाणी जाण्याची प्रत्येकाची धावपळ असते. त्यात सध्या दहावीच्या परीक्षेचा पेपर देखील आहे.त्यामुळे परीक्षा केंद्रावर जाणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी संख्या असते.कर्जत तालुक्यातील कळंब भागातील दहावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्र हे पोशिर येथे जाण्यासाठी विद्यार्थ्यांची मोठी धावपळ सुरू असते.
आज २५ फेब्रुवारी रोजी दहावीचा पेपर असल्याने आणि सकाळी आपल्या परीक्षा केंद्रावर दहा वाजता आपल्या उपस्थितीची नोंद करण्याची वेळ असल्याने कळंब भागातील दहा गावातील विद्यार्थी पोशिर येथील परीक्षा केंद्राकडे निघाले होते. पोशिर येथील श्रमजीवी विद्यालयात दहावीचे परीक्षा केंद्र असून त्या ठिकाणी परीक्षा देण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी कळंब येथून नेरळ कडे जाणारी एसटी गाडी पकडली. कळंब वरून वेळेवर निघालेली एसटी गाडी पोशिर गावच्या अलीकडे दीड किलोमीटर अंतरावर ही एसटी गाडी बंद पडली. त्यानंतर एसटीचे चालक आणि वाहक यांनी गाडी सुरू करण्याचा प्रयत्न केला. मात्र गाडी तास झाला तरी सुरू होत नव्हती, शेवटी परीक्षा देण्यासाठी निघालेल्या विद्यार्थ्यांचे टेन्शन वाढले.
या गाडी मधून नेरळ कडे जाणारे शहजाद लोगडे या तरुणाने रस्त्यावर उतरून पोशिर नेरळ कडे जाणाऱ्या वाहनांना थांबवून एसटी मधून प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना पाठवून देऊ लागले.परीक्षेची वेळ जवळ येत असल्याने अनेक विद्यार्थ्यांनी तेथून पायी वारी देखील सुरू केली.मात्र दीड दोन किलोमीटर अंतराचा प्रवास आणि त्यानंतर परीक्षा द्यायची असल्याने रस्त्याने जाणारे वाहनचालक यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत होता.अनेक दुचाकी चालक तसेच कार चालक हे विद्यार्थ्यांना घेऊन पोशिर विद्यालयाच्या जवळ सोडतानाचे आशादायक चित्र एसटी गाडी बंद पडल्यानंतर दिसून येत होते.
अचानक बंद पडलेल्या एसटी गाडी मध्ये २५ चे आसपास विद्यार्थी होते आणि ते सर्व परीक्षा देण्यासाठी निघाले होते. ओलमन पासून बोरगाव आणि वारे भागातील हे विद्यार्थी परीक्षा देण्यासाठी निघाले होते.साधारण दहा हून अधिक गावातील विद्यार्थी एसटी गाडी बंद पडल्याने तेथे थांबून होते.






