परदेशामध्ये अडकलेल्या भारतीयांच्या मदतीसाठी राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी सक्रीय झाल्या आहे (फोटो - सोशल मीडिया)
पुणे: इस्रायल आणि अमेरिकेने इराणवर केलेल्या भीषण हल्ल्यामुळे युद्धाची परिस्थिती निर्माण झाली आहे. इराणने देखील दुबईवर जोरदार हल्ला केला आहे. मध्यपूर्व भागामध्ये युद्धाची भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. या युद्ध परिस्थितीमध्ये दुबईसह (Dubai News) आखाती राष्ट्रामध्ये अनेक भारतीय विद्यार्थी आणि पर्यटक अडकले आहेत. आंतरराष्ट्रीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र तसेच भारतातील अनेक नागरिक दुबई आणि इराण यासारख्या देशांमध्ये अडकून पडले आहेत. हवाई सेवा बंद झाल्याने त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेकांची उड्डाणे रद्द झाल्यामुळे हॉटेलमध्ये मुक्काम वाढवावा लागत असून, खर्च व इतर व्यवस्थापनाचे प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यांच्यासाठी राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni) यांनी मदतीचा हात पुढे केला आहे.
मध्यपूर्व भागातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या परराष्ट्र मंत्रालय व विमान वाहतूक विभागाने नागरिकांना सुरक्षितपणे मायदेशी परत आणण्यासाठी व्यापक स्तरावर तयारी सुरू केली आहे. अडकलेल्या प्रवाशांमध्ये विद्यार्थी, पर्यटक तसेच इतर नागरिकांचा समावेश असून त्यांना आवश्यक मदत मिळावी यासाठी समन्वय यंत्रणा सक्रिय करण्यात आली आहे. दरम्यान, परदेशात अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांनी कोणत्याही प्रकारची अडचण असल्यास थेट संपर्क साधावा, असे आवाहन राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी केले आहे. केंद्र शासनाने उपलब्ध करून दिलेल्या सेवा व सुविधा संबंधितांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले. मदतीसाठी ९४२२०३७३०६ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हे देखील वाचा : “फक्त तू ये. धमक्या देऊ नको..”; मनोज जरांगे पाटलांचे धनंजय मुंडेंच्या समर्थकाला सडेतोड उत्तर
नागरिकांना कोणतीही अडचण येऊ नये, हा केंद्र सरकारचा मुख्य उद्देश असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आवश्यक ती सर्व तयारी करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. संबंधित यंत्रणा नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर असून परिस्थितीवर सतत लक्ष ठेवण्यात येत असल्याचे त्या म्हणाल्या.
हे देखील वाचा : दुबईत अडकलेल्या भारतीयांना घेऊन पहिले विमान मुंबईत दाखल; पर्यटकांनी सांगितली थरारक आपबीती
इराण आणि इस्रायलमध्ये युद्ध सुरु झाल्याने याचा विपरित परिणाम हवाई उड्डाणांवर झाला आहे. यामुळे विमान सेवा ठप्प पडली आहे. तसेच आखाती देशांनी आपले हवाई क्षेत्र बंद केले होते. तसेच दुबई विमानतळही बंद करण्यात आले होते आणि अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली होती. यामुळे विमानतळांवर मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी झाली होती. तसेच हजारो भारतीय पर्यटक हे या देशांमध्ये अडकले होते. या सर्वांना सुरक्षित भारतामध्ये परत आणण्यासाठी परराष्ट्र मंत्रालय पूर्ण प्रयत्न करत होते. अखेर प्रवाशांना घेऊन पहिले विमान मुंबईमध्ये दाखल झाले आहे. युद्धजन्य अशा परिस्थितीत काल रात्री सुमारे दोन वाजता दुबईहून एक फ्लाइट मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचली. यावेळी प्रवाशांनी त्यांच्यावर आलेले आपबीती सांगितली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर हे दुबईहून आलेले विमान पोहचले आहे.






