आमदार निकमांनी अजित पवारांना वाहिली श्रद्धांजली (फोटो- सोशल मिडिया)
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे विमान अपघातात दुर्दैवी निधन
सावर्डेतील शोकसभेत सारे गहिवरले
शोकसभेला डॉ. तानाजीराव चोरगे यांची उपस्थिती
चिपळूण: दादा नाहीत, ही कल्पनाच सहन होत नाही. आयुष्यात असा दिवस येईल असं कधीच वाटले नाही. राजकीय काय होईल याची चिंता नाही, मी त्याचा विचार ही करीत नाही. मात्र, स्व. गोविंदराव निकम यांच्या नंतर आम्हाला आणि सह्याद्रीला दादांनी सावरले, अशा भावना आ. शेखर निकम यांनी व्यक्त करून अश्रृंना वाट मोकळी करून दिली. भावनाविवश आणि आ. निकम यांच्या तोंडून निघणारे कातरलेले शब्द आणि येणारे हुंदके बघून उपस्थित ही सारे गहिवरलेले गेले होते. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांचे बारामती येथे विमान अपघातात दुःखद निधन झाले. बुधवारी सकाळी निधनाचे वृत्त समजताच आ. शेखर निकम तातडीने बारामती येथे दाखल झाले. शुक्रवारी रात्री उशिरा सावर्डे येथे दाखल झाले. त्यांनतर सावर्डे येथे श्रद्धांजली आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.
काळजी करणारे दादा आम्हाला हवे होते…
आ. निकम म्हणाले की, आयुष्यातील हे दोन दिवस काळे दिवस माझ्यासाठी ठरले, असे दिवस येतील असे कधीच वाटले नव्हते. स्व. निकम साहेबांचे निधन झाले. त्या दिवशी दादा इथे सावर्डेमध्ये होते. निकम साहेब गेल्यानंतर आम्हाला व सह्याद्री परिवाराला दादांनी सावरले. आज आम्ही खऱ्या अर्थाने पोरके झालो आहोत. सर्व आमदारांना आपण पोरके झाल्याचे वाटत आहे. आमचे पुढे राजकीय काय होईल ? याचा विचार कोणाच्याही मनात नाही. माझ्या तर अजिबात नाही. स्वतःची चिंता करणारे आम्ही नाही. कारण आमची चिंता आणि काळजी करणारे दादा आम्हाला हवे होते. सर्वसामान्यांसाठी दादा आम्हाला पाहिजे होते, असे आ. निकम यांनी यावेळी सांगितले.
माझे सबंध सन २००० पासून सुरू झाले. मोठ्या साहेबांजवळ नाते होते. दादांजवळ ही एक वेगळे नाते तयार झाले यातून भावनिक सबंध कधी जुळले हे कळलेच नाही. मोठ्या भावासारखे त्यांनी मला सांभाळले. हक्काने मागावे आणि त्यांनी द्यावे, असे नाते तयार झाले होते. दादांनी चिपळूणसाठी भरपूर असा निधी दिला.
कसबामध्ये जागतिक पातळीवरचे छ. संभाजी महाराज स्मारक उभे करण्याचा ध्यास घेऊन काम सुरू केले होते. त्याचबरोबर मार्लेश्वरचा विकास ही वेगळ्या धर्तीवर करण्याचा दादांचे स्वप्न होते. जे जे देता येईल ते ते दादांनी दिले आहे, असे आ निकम यांनी सांगितले. दादांविषयी काय काय सांगू? असे म्हणत आ. निकम यांचा कंठ दाटून आला. शब्द कातरू लागले आणि डोळ्यातून अश्रृंनी वाट मोकळी केली. आ. निकम यांची ही स्थिती बघून शोकसभेल असणारे शेकडो कार्यकर्तेही गहिवरत्न गेले होते.
डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.






