रायपूर – बागेश्वर महाराज आता नव्या वादात अडकले आहेत. संत तुकाराम महाराज यांना त्यांची पत्नी रोज मारहाण करायची. म्हणूनच त्यांनी देवाचा धावा घेतला, अशी मुक्ताफळे बागेश्वर बाबा यांनी उधळली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. भाजपच्या अध्यात्मिक आघाडीसह राष्ट्रवादी काँग्रेसनेही बागेश्वर महाराजांच्या विधानाचा निषेध नोंदवला आहे. बागेश्वर महाराजांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
काय म्हणाले बागेश्वर महाराज?
“संत तुकाराम महाराष्ट्रातील एक महात्मा होते. त्यांची पत्नी त्यांना रोज मारायची. रोज काठीने मारायची. कुणी तरी त्यांना विचारलं, तुम्ही रोज बायकोचा मार खाता. तुम्हाला लाज नाही वाटत का? त्यावर तुकाराम म्हणाले, मला मारहाण करणारी बायको मिळाली ही देवाचीच कृपा आहे. त्यावर ती व्यक्ती म्हणाली, यात देवाची कृपा काय? तेव्हा तुकाराम म्हणाले, अरे वा… प्रेम करणारी पत्नी मिळाली असती तर मी देवाच्या प्रेमात पडलो नसतो. भक्तीत लीन झालो नसतो. पत्नीच्या प्रेमात पडलो असतो. मारहाण करणारी पत्नी मिळाल्याने देव मला त्याची सेवा करण्याची संधी तर देतो. प्रभू रामाच्या चरणी लीन होण्याची संधी तर देतोय….”
संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान
भाजपच्या अध्यात्मिक आघाडीचे आचार्य तुषार भोसले यांनी बागेश्वर महाराजांचा निषेध नोंदवला आहे. बागेश्वर धाम यांनी जगतगुरु तुकारामाबद्दल बोलताना चुकीचा संदर्भ दिला आहे. त्यातून संत तुकाराम महाराज आणि त्यांच्या पत्नीच्या प्रतिमेला ठेच पोहोचली आहे. यातून केवळ वारकरी संप्रदायाचा नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान झाला आहे. त्यामुळे बागेश्वर महाराजांनी तुकारामांची माफी मागावी, अशी मागणी भाजपच्या अध्यात्मिक आघाडीचे आचार्य तुषार भोसले यांनी केली.