संग्रहित फोटो
साताऱ्यात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा मेळावा नुकताच पार पाडला. या मेळाव्यात मार्गदर्शन केल्यानंतर शंभूराज देसाई यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी व्यासपीठावर आमदार महेश शिंदे, संजू राजे नाईक निंबाळकर, अनिकेत राजे नाईक निंबाळकर, कराडचे नगराध्यक्ष राजेंद्र यादव, जिल्हाध्यक्ष रणजितसिंह भोसले, शिंदे गटाच्या जिल्हा संपर्कप्रमुख रेशमाताई जगताप इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
देसाई पुढे म्हणाले, महायुतीला घटक मानून जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत जागा वाटपाला आमचे प्राधान्य राहील मात्र तिन्ही घटक पक्षांनी शिवसेनेला सन्मानाची वागणूक द्यावी. जागा वाटपात प्राधान्याने आमचा विचार व्हायला हवा. वाटाघाटी यशस्वी झाल्या तरच महायुती म्हणून निवडणूक लढवणार असल्याचे देसाई यांनी सांगितले. मानसन्मान राखला तर ठीक अन्यथा स्वबळावर लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आमचे चर्चेचे सर्व पर्याय खुले आहेत. जो आमच्याशी समविचाराने चर्चा करेल त्या बाबतीत नक्कीच राजकीय समीकरणांचा विचार केला जाईल, असे स्पष्ट संकेत त्यांनी दिले .
पालिका निवडणुकीप्रमाणे महायुती झाली नाही तर यावेळी स्वतंत्र निवडणूक शिवसेना लढवणार आहे. शिवसेना पूर्ण ताकतीने आपल्या पद्धतीने निवडणुकीत उतरेल. कराडमध्ये पालिका निवडणूक ज्या पद्धतीने लढवली त्याच पद्धतीने जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका लढवल्या जातील यावेळी कोणाचाही विचार करणार नाही. फलटण पालिकेत आमचे काही अंदाज चुकले त्यामुळे आम्हाला अपयश आल्याचे त्यांनी मान्य केले. राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षाबरोबर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही तसेच भारतीय जनता पार्टी कडून सुद्धा कोणत्याही प्रकारचा प्रस्ताव आपल्याला आला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रत्येक विधानसभा मतदारसंघ निहाय पक्ष निरीक्षक नेमून त्यांच्याकडून अहवाल घेतले जाणार आहेत. पक्षाने निवडणूक लढवण्याची पूर्ण तयारी केली आहे. त्यासाठीच शिवसैनिकांची बैठक घेण्यात आल्याचे देसाई यांनी सांगितले. जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गण निहाय इच्छुकांची माहिती घेण्यात आली आहे, असे देसाई म्हणाले.
हे सुद्धा वाचा : पुण्याचा कारभार कोणाच्या हातात जाणार? निकालाआधीच रविंद्र धंगेकरांचा मोठा विश्वास






