शरद पवारांच्या पक्षात इनकमिंग सुरू, विविध पक्षातील शेकडो कार्यकर्त्यांचा प्रवेश; जितेंद्र आव्हाड यांची माहिती (फोटो सौजन्य-X)
ठाणे : विविध पक्षातील शेकडो कार्यकर्त्यांनी आज (24 जून) राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा विधीमंडळ गटनेते डॉ.जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. दरम्यान, या प्रसंगी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना, जे लोक पक्ष सोडून गेले. त्यांच्याकडे लक्ष देण्याऐवजी नवीन कार्यकर्त्यांची फौज उभारणे आणि त्यांच्यातून नेते घडविणे ही आमच्या पक्षाची शिकवण आहे. तेच आम्ही करीत आहोत, असे डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या पक्ष कार्यालयात हा पक्षप्रवेश पार पडला. या वेळेस शहराध्यक्ष सुहास देसाई, कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, महिलाध्यक्ष सुजाताताई घाग, कळवा – मुंब्रा विधानसभाध्यक्ष शमीम खान, अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष मुफ्ती अशरफ आदी पदाधिकारी उपस्थित होते.
एमआयएम, काँग्रेस या पक्षांसह इतर राजकीय, सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या कार्यकर्त्यांनी शरद पवार आणि डॉ.जितेंद्र आव्हाड यांच्या धर्मनिरपेक्ष विचारधारेवर विश्वास ठेवून हा पक्ष प्रवेश केल्याचे प्रवेशकर्त्या कार्यकर्त्यांनी सांगितले. तसेच सध्या पक्षाच्या संघर्षाचा काळ आहे. या काळातही शमीम खान आणि मुफ्ती अशरफ यांच्या पुढाकारातून शेकडो कार्यकर्ते पक्षात आले आहेत. पक्षात आलेले हे कार्यकर्ते धर्मनिरपेक्ष विचारधारेवर चालणारे आहेत. सध्याच्या अस्थिर वातावरणातही राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षच न्याय करू शकतो, यावर लोकांचा विश्वास आहे, हे या पक्षप्रवेशाने सिद्ध झाले आहे, असे डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.
कळव्यातील पक्षफुटीबाबत विचारले असता यावेळी आव्हाड यांनी सांगितले की, जे पक्ष सोडून गेले त्यांच्याकडे आम्ही लक्ष देत नाही. कारण नवीन कार्यकर्ते घडविणे आणि त्यातून नवनेतृत्व निर्माण करणे, हेच आमचे ध्येय आहे. शिवसेनेतील इच्छुकांची भरमार झाली आहे. ते सर्वांनाच उमेदवारीचे आश्वासन देत आहेत. जणू काही 130 चे 260 नगरसेवक ते सभागृहात नेणार आहेत. पण इथून तिकडे गेलेल्यांना उमेदवारीचे आश्वासन दिल्याने जे जुणे जाणते शिवसैनिक नाराज झाले आहेत किंवा नाही, याच्याशी आपणाला देणेघेणे नाही. कारण दुसर्याच्याघरात वाकून बघण्याची आम्हाला सवय नाही. पोस्टवरून कोणाचे फोटो काढले जातात, कुणाचे फोटो टाकले जातात, हे समस्त कळवेकर पहात आहेत. त्यावर आपण भाष्य न केलेले बरे, असेही डॉ.जितेंद्र आव्हाड म्हणाले.
पहिलीपासून हिंदी सक्तीचा निर्णय घेण्यात आला आहे. हा अकारण निर्माण केलेला वाद आहे. मूळ प्रश्नावरून जनतेचे लक्ष हटविण्यासाठी हिंदीचा विषय ताणला जात आहे. मात्र, हिंदीचे कौतूक करताना इंग्रजीला शिव्या दिल्या जात आहेत. इंग्रजी ही वैश्विक भाषा आहे. अनेक भाषा शिकून माणसाने समृद्ध झालेच पाहिजे. जर आपण अनेक भाषा शिकलो तर जगाचे दरवाजे आपणाला उघडले जातील. ज्याला जी भाषा शिकायची असेल त्याला ती भाषा शिकू द्यावी; पण, त्यासाठी सक्ती नसावी. महाराष्ट्राच्या मातीची ओळख ही मराठी आहे. त्यामुळे मराठीची सक्ती समजू शकतो. पण, मतांच्या लाचारीसाठी हिंदीची सक्ती करणे हे अवघडच आहे. मतांसाठी आपल्या भाषेवर अन्याय का? गुजरात, तमीळनाडू , बंगाल, ओरिसामध्ये अशी सक्ती नसताना महाराष्ट्रातच ही सक्ती का? स्वाभिमानी महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवलाय? ज्याला जे खायचे आहे; ते त्याला खाऊ द्यावे. ज्याला जे शिकायचे आहे ते त्याला शिकू द्यावे. पण, कशाचीच जबरदस्ती करू नये. अशी सक्ती केवळ वाद पेटवण्यासाठीच केली जात असते, असेही डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी सांगितले.
“आमदार आपल्या भेटीला” हा अभिनव उपक्रम राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाने राबविण्यास सुरूवात करण्यात येत आहे. आज पक्ष कार्यालयात हा उपक्रम राबविण्यात आला. डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्तिशः तक्रारदारांना भेटून सुमारे 50 पेक्षा अधिक तक्रारींचे निरसन केले.