काही ठिकाणी वन्य प्राण्यांच्या हल्ल्याच्या घटनाही घडल्या असून त्यामुळे गावागावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या परिस्थितीत वन विभागाकडून प्रभावी उपाययोजना होत नसल्याची नाराजी शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. वन्य प्राण्यांमुळे होणाऱ्या शेतीच्या नुकसानीचा पंचनामा करण्यासाठी अधिकारी येतात, मात्र नुकसानभरपाई मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना महिनोनमहिने प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती अधिकच बिकट होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, शासन व वन विभागाने या गंभीर प्रश्नाकडे तातडीने लक्ष देऊन ठोस उपाययोजना केल्या नाहीत, तर शेतकरी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडतील, असा इशारा तानाजी सावंत यांनी दिला आहे. यावेळी कादर नाईकवडी, श्रीधर करडे, संग्राम पाटणकर, प्रकाश साळुंखे, प्रकाश माळी, सुजित पवार, अमित पाटील, सागर कोळेकर, रोहित घुबडे, अमर औरादे व तीफिक गुराडी उपस्थित होते.
जनचळवळीच्या वतीने शासनाकडे काही महत्त्वाच्या मागण्या करण्यात आल्या आहेत.
वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास किमान पंचवीस लाख रुपये तत्काळ भरपाई देण्यात यावी.
जखमी झालेल्या व्यक्तीस पाच लाख रुपयांची मदत द्यावी. शेतीच्या नुकसानीचा तातडीने पंचनामा करून शंभर टक्के नुकसानभरपाई तीस दिवसांच्या आत देण्यात यावी.
वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी विशेष पथके नियुक्त करून पिंजरे लावणे, सातत्याने गस्त ठेवणे तसेच गावांच्या संरक्षणासाठी कुंपणाची व्यवस्था करावी.
शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी सूर्यऊर्जेवर चालणाऱ्या कुंपण योजनेस शंभर टक्के अनुदान द्यावे.
प्रभावित गावांमध्ये वन विभागाने तातडीने बैठका घेऊन ठोस निर्णय घ्यावेत,अशा मागण्या गावकऱ्यांनी केल्या आहेत.






