महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्गाला वेग! वर्ध्यात ‘शक्तीपीठ संवाद यात्रा’ला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
या संवाद यात्रेला स्थानिक शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, शक्तीपीठ महामार्गासाठी जमीन देण्यास तयार असलेले शेतकरी तसेच समृद्धी महामार्गामुळे लाभ झालेल्या शेतकऱ्यांनी आपल्या अनुभवांची देवाणघेवाण करत या प्रकल्पाबाबत सकारात्मक भूमिका मांडली. विशेष म्हणजे, समृद्धी महामार्गामुळे झालेल्या विकासाचा प्रत्यक्ष अनुभव मांडताना अनेक शेतकऱ्यांनी नव्या संधी, वाढलेली जमीनमूल्ये आणि रोजगारनिर्मिती यांचा उल्लेख केला, ज्यामुळे शक्तीपीठ महामार्गाविषयीही आशावाद अधिक बळकट झाला आहे.
या कार्यक्रमाला वर्धा जिल्हाधिकारी वानमथी सी. तसेच एमएसआरडीसीचे सह व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीनारायण मिश्रा, एमएसआरडीसी मुख्य अभियंता साहेबराव सुरवसे उपस्थित होते. त्यांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधत प्रकल्पाची सविस्तर माहिती दिली, संभाव्य फायदे स्पष्ट केले आणि जमीन संपादन प्रक्रियेत पारदर्शकता व न्याय्य मोबदल्याची हमी दिली. एकूणच, ‘शक्तीपीठ संवाद यात्राच्या माध्यमातून प्रशासन आणि शेतकरी यांच्यात विश्वासाचे वातावरण निर्माण होत असून, शक्तीपीठ महामार्गाच्या उभारणीसाठी आवश्यक असलेले लोकसहभागाचे पायाभूत काम यशस्वीपणे सुरू झाल्याचे चित्र पवनार येथे पाहायला मिळाले.
महाराष्ट्र शासन सध्या शक्तीपीठ महामार्गाच्या माध्यमातून समृद्धी महामार्गापेक्षा अधिक लांब असा महामार्ग उभारण्यासाठी प्रयत्नशील आहे. समृद्धी महामार्ग होता ७०१ किमी तर शक्तीपीठ महामार्ग आहे ८५६ किमी. शक्तीपीठ महामार्ग हा केवळ विदर्भातूनच नाही तर मराठवाड्यातून देखील जात आहे. विदर्भासह मराठवाड्याला देखील याचा फायदा होणार आहे. समृद्धी महामार्गाला देखील सुरुवातीला काही विरोध झाला. मात्र शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांना पाच पट मोबदला देण्यात आला आणि शेतकऱ्यांनी त्या पैशातून अजून अतिरिक्त जमीन घेतली. शक्तिपीठसाठी वर्धा व यवतमाळ जिल्ह्यातील सेक्शन १८ पूर्ण झाले असून सद्यस्थितीत भूसंपादन निवाड्याची प्रक्रिया सुरु आहे. शेतकऱ्यांनी जमीन देण्यास समंती दर्शविली तर लगेच शेतकऱ्यांना मोबदला देण्यात येईल, अशी माहिती एमएसआरडीसी सह व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली.
वर्धा जिल्ह्यातील पडेगाव परिसरात माझी साडे तीन एकर शेती आहे. साडे तीन एकर पैकी सव्वा दोन एकर शेती शक्तीपीठ महामार्गात जात आहे. यामुळे माझ्या जमिनीचे दोन भाग होत आहेत. अधिकारी आमच्या जमिनीच्या संयुक्त मोजणीसाठी आले होते. आम्ही सर्व अधिकाऱ्यांना सर्वतोपरी सहकार्य केले. त्यांनी आमच्या सर्व जमिनीचे मूल्यांकन केले. आमचे आधीपासूनच सर्व अधिकाऱ्यांना सहकार्य आहे आणि शक्तीपीठ महामार्गासाठी पाठिंबा आहे, अशी माहिती शेतकरी सुभाष घायवट यांनी दिली.
पडेगावात माझी शेती आहे. माझ्या एकूण शेतीपैकी साडे तीन एकर शेती शक्तीपीठ महामार्गात जात आहे.माझ्या जमिनीची संयुक्त मोजणी देखील झाली. अधिकारी ज्यावेळी माझ्या शेतात आले मोजणीसाठी त्यावेळी मी त्या सर्वांचे स्वागत केले. आमच्या गावातून इतका मोठा महामार्ग जात आहे याचा मला नक्कीच आनंद आहे. या मोठ्या आणि सर्वांसाठी लाभदायी प्रकल्पाला विरोध करणे योग्य गोष्ट नाही, असे मला तरी वाटते. माझ्या गावापासून काही अंतरावर एमआयडीसी आहे. जर भविष्यात या महामार्गामुळे माझ्या गावातच जर एमआयडीसी झाली तर माझा मुलगा गावातच नोकरी करू शकतो. त्याला लांब जाण्याची गरज लागणार नाही. याच पद्धतीने गावातील इतर युवकांना देखील रोजगार उपलब्ध होईल. याच बरोबर दळणवळणाची सोया होईल. इतर मुख्य तालुक्यांच्या ठिकाणी आणि जिल्ह्याच्या ठिकाणी आम्हाला जाणे शक्य होईल. यामुळे सर्व इतर शेतकऱ्यांना ही आवाहन आहे की यात तुमचे नुकसान नाही. यामुळे या महामार्गाच्या उभारणीच्या प्रक्रियेत सहभागी व्हावे, अशी माहिती शेतकरी मंगेश भुसे यांनी दिली.
शक्तीपीठ संवाद यात्रेत आम्हा सर्व शेतकऱ्यांना पूर्ण माहिती देण्यात आली. माझी देखील शक्तीपीठ महामार्गात जमीन जात आहे. आमचा शक्तीपीठ महामार्गाच्या उभारणीला पाठिंबा आहे. आमची ओलिताची शेती आहे. मात्र हंगामी शेती असल्याने यांत्रिकीकरणाची आम्हाला गरज भासते. या जमिनीच्या मोबदल्यात मिळणाऱ्या पैशातून ट्रॅक्टर तसेच इतर शेतीची यांत्रिक अवजारे घेता येतील आणि उर्वरित शेतीसाठी त्याचा उपयोग होईल. याच बरोबर मुलांच्या उच्चशिक्षणासाठी, घर बांधण्यासाठी या पैशांचे वापर करण्याचे नियोजन आहे. तसेच शक्तीपीठ महामार्गामुळे आम्हाला आमच्या धार्मिक स्थळांना देखील भेट देणे सोयीस्कर होईल, अशी माहिती शेतकरी सुरेश फडतारे यांनी दिली.
आमची दिग्रस येथे शेतजमीन आहे. समृद्धी महामार्गाच्या उभारणीच्या वेळी आमची त्यात जमीन गेली. त्या पैशातून मी अतिरिक्त तीन एकर शेती घेतली. त्याच बरोबर दोन नवीन घर देखील घेतले. आता शक्तीपीठ महामार्गाच्या उभारणीत देखील माझी सुमारे तीन ते साडे तीन एकर शेती जात आहे. आमचा देखील प्रकल्पाला पाठिंबा आहे, अशी माहिती शेतकरी शेख महमूद यांनी दिली.
माझी पांढरकवडा येथे १६ एकर शेती होती. त्यापैकी ८ एकर शेती समृद्धी महामार्गाच्या उभारणीत गेली. शेतीच्या मोबदल्यातून मिळालेल्या पैशातून मी ३० एकर शेतजमीन घेतली. कायद्यानुसार सर्व प्रक्रिया झाल्या. मोबदल्याची सर्व प्रक्रिया अगदी पारदर्शक पद्धतीने झाली. झाडे, विहीर, गोठा तसेच तुमच्या जमिनीतून जाणाऱ्या पाईपलाईनचा देखील शासन तुम्हाला मोबदला देते. आम्हाला तर नक्कीच फायदा झाला आहे, हे आम्ही ठामपणे सांगू शकतो, अशी माहिती शेतकरी अँड. महेंद्र धोटे यांनी दिली.
माझी समृद्धी महामार्गात जमीन ज्यावेळी गेली त्यावेळी मला तब्बल ८२ लाख हेक्टर प्रमाणे मूल्यांकन करण्यात आले. असे मला तीन हेक्टर जमिनीचे सुमारे ३ कोटी रुपये मिळाले. सर्व प्रक्रिया अगदी पारदर्शक पद्धतीने झाली. आज मी नक्कीच सांगू शकतो की मी समृद्ध शेतकरी आहे, अशी माहिती शेतकरी प्रशांत इंगळे यांनी दिली.






