फोटो सौजन्य सोशल मीडिया
सातारा : दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनावर झालेल्या पोलिस कारवाईच्या निषेधार्थ आणि आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी युवा क्रांती, सातारा यांच्या वतीने शुक्रवारी (दि. २४) सकाळी गांधी मैदान (राजवाडा) येथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, शाहू चौकपर्यंत समर्थन रॅली काढण्यात आली.
या रॅलीत सहभागी झालेल्या युवक-युवतींनी परीक्षा व्यवस्थेतील कथित गोंधळ, पेपरफुटीच्या घटना, परीक्षा वारंवार पुढे ढकलल्या जाणे, विद्यार्थ्यांवर वाढत असलेला मानसिक ताण तसेच जंतर-मंतरवरील आंदोलनादरम्यान झालेल्या पोलिस कारवाईचा निषेध व्यक्त केला. यावेळी केंद्र सरकारने विद्यार्थ्यांशी तातडीने संवाद साधावा, आंदोलनावरील पोलिस कारवाईची निष्पक्ष चौकशी करावी आणि संबंधित दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.
युवा क्रांतीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांच्या न्याय मागण्यांना पाठिंबा देण्यासाठी ही समर्थन रॅली आयोजित करण्यात आली आहे. देशभरातील तरुणांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबाबत एकजूट दाखवून त्यांच्या पाठीशी उभे राहण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले. रॅलीदरम्यान विविध घोषणाबाजी करून आंदोलनाला समर्थन व्यक्त करण्यात आले. या समर्थन रॅलीत मोठया संख्येने युवक-युवती, विद्यार्थी आणि नागरिक सहभागी झाले .
दिल्लीतील जंतर-मंतर येथे NEET परीक्षेतील कथित अनियमितता, पारदर्शकतेचा अभाव आणि परीक्षा प्रक्रियेतील त्रुटींविरोधात विद्यार्थी व पालकांनी आंदोलन केले. आंदोलकांनी निष्पक्ष चौकशी, दोषींवर कठोर कारवाई आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याचे संरक्षण करण्याची मागणी केली. आंदोलनादरम्यान विविध विद्यार्थी संघटनांनी परीक्षा व्यवस्थेत सुधारणा करण्याची गरज व्यक्त केली. दुसरीकडे, संबंधित अधिकाऱ्यांनी परीक्षा प्रक्रियेबाबत आवश्यक ती कारवाई आणि चौकशी सुरू असल्याचे सांगितले. या आंदोलनामुळे NEET परीक्षेच्या विश्वासार्हतेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून, लाखो विद्यार्थ्यांचे लक्ष आता सरकार आणि संबंधित संस्थांच्या पुढील निर्णयांकडे लागले आहे.






