पंढरीतून ५६ लाख शेतकऱ्यांना दिलासा; 'शब्द पाळला' म्हणत मुख्यमंत्र्यांची घोषणा (Photo Credit- X)
पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे आयोजित सुधाकर पंत परिचारक राज्यस्तरीय कृषी महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार गोपीचंद पडळकर, राजेंद्र राऊत, समाधान आवताडे, विजयकुमार देशमुख, अभिजीत पाटील,उत्तमराव जानकर, नारायणराव पाटील, माजी आमदार प्रशांत परिचारक, जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, बाजार समितीचे अध्यक्ष हरीश गायकवाड, उपसभापती राजू गावडे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी आणि वारकरी उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पंढरपूर येथे ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026’ मधील पात्र शेतकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरुपात प्रमाणपत्रांचे वितरण केले. तसेच यावेळी कर्जमुक्त झालेल्या या शेतकऱ्यांना मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते सोलापूर जिल्हा… pic.twitter.com/VOyDlWu9RX — CMO Maharashtra (@CMOMaharashtra) July 24, 2026
यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा शब्द राज्य सरकारने पाळला असून, ही देशातील सर्वात मोठी कर्जमाफी आहे. राज्यातील ५६ लाख शेतकरी या योजनेचा लाभ घेणार असून, पहिल्या टप्प्यात १७ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात १३ हजार कोटी रुपये ३१ जुलैपूर्वी जमा केले जाणार आहेत. त्यानंतर बँकांकडून माहिती प्राप्त होताच पुढील याद्या जाहीर केल्या जातील. एकही पात्र शेतकरी वंचित राहणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.
मुख्यमंत्री म्हणाले की, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन देण्यात येणार आहे. कर्जमाफीचा शुभारंभ राज्याच्या कोणत्याही शहरातून न करता शेतकरी आणि वारकरी यांच्या पवित्र संगमभूमी असलेल्या पंढरपूरातून करण्यामागे विशेष भावना असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी कृषी क्षेत्रासाठी सरकारने घेतलेल्या निर्णयांची माहिती देताना सांगितले की, ७.५ हॉर्स पॉवरपर्यंतच्या कृषीपंपांची थकीत वीजबिलेही माफ करण्यात आली असून ५० लाख शेतकऱ्यांचे तब्बल ४८ हजार कोटी रुपयांचे वीजदेयक शासनाने भरले आहे. याशिवाय ठिबक सिंचन, यांत्रिकीकरण, खत अनुदान अशा विविध योजनांवर गतवर्षी ९५ हजार कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला.
शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढावा यासाठी महाराष्ट्राने देशात प्रथमच ‘महा विस्तार’ हे कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ॲप विकसित केले असून, जवळपास ५० लाख शेतकऱ्यांनी त्यावर नोंदणी केली असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. या ॲपद्वारे खत व्यवस्थापन, कीड नियंत्रण, पाणी व्यवस्थापन, आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि पीक सल्ला शेतकऱ्यांना त्यांच्या बोलीभाषेत उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पंढरपूर कॉरिडॉरबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, सर्व बाधितांचे शंभर टक्के समाधानकारक पुनर्वसन करण्यात येईल. महाराष्ट्रातील कोणत्याही तीर्थक्षेत्रात झाले नाही, इतके उत्तम पुनर्वसन पंढरपूरमध्ये करण्याचा सरकारचा निर्धार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. वाढत्या भाविकांसाठी सुरक्षित, शिस्तबद्ध आणि आधुनिक सुविधा निर्माण करण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
यंदाच्या आषाढी वारीसाठी ३५ लाखांहून अधिक वारकरी पंढरपुरात दाखल झाल्याचे सांगत मुख्यमंत्री म्हणाले की, सुमारे २१ किलोमीटर लांबीची दर्शन रांग लागली आहे. जर्मन हँगर, वैद्यकीय सेवा, पाद्यसेवा, निवास आणि इतर सुविधा प्रशासनाने उत्तम प्रकारे उपलब्ध करून दिल्याचे त्यांनी नमूद केले.
भीमा नदीवर बॅरेज उभारण्याबाबत आवश्यक निर्देश दिले जातील तसेच चंद्रभागा नदीवरील नवीन पूल ‘पूल कम बंधारा’ म्हणून विकसित करण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. कोल्हापूर-सांगलीतील अतिरिक्त पाणी डायव्हर्जन कॅनलद्वारे उजनी धरणात ३५ ते ४० टीएमसी पाणी आणण्याचे काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच लोणंद-पंढरपूर आणि पंढरपूर-विजापूर रेल्वे मार्ग पूर्ण करण्यासाठीही शासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमात ‘इन्फ्रामॅन : देवेंद्र फडणवीस – मेकिंग ऑफ महाराष्ट्र’ या पुस्तकाचे तसेच निवासी मूकबधिर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. प्रारंभी मुख्यमंत्र्यांनी कृषी महोत्सवातील विविध दालनांना भेट देऊन आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती घेतली.






