फोटो सौजन्य - Social Media
1991 मध्ये प्रदर्शित झालेल्या गाजलेल्या Dil Hai Ke Manta Nahin या चित्रपटाच्या आठवणींना उजाळा देताना अभिनेत्री पूजा भट्ट यांनी अभिनेता आमिर खानसोबतच्या नात्याबाबत एक मनोरंजक खुलासा केला आहे. चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान दोघांमध्ये जबरदस्त केमिस्ट्री आणि आकर्षण होते, मात्र ते नाते कधीही खऱ्या आयुष्यातील प्रेमसंबंधांपर्यंत पोहोचले नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
मुलाखतीत पूजा भट्ट म्हणाल्या, “Dil Hai Ke Manta Nahin च्या शूटिंगदरम्यान कॅमेरा सुरू असताना आम्ही अक्षरशः एकमेकांच्या प्रेमात होतो. आमची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांनाही खूप आवडली होती.” दोघांमध्ये त्या काळात आकर्षण होते का, असा प्रश्न विचारल्यावर त्यांनी हसत उत्तर दिले, “हा प्रश्न आमिरलाच विचारायला हवा. मी आकर्षक होतेच ना? तो माझ्याकडे आकर्षित झाला असता तर त्यात आश्चर्य काय?”
तथापि, त्यांनी स्पष्ट केले की दोघांमधील ती भावना केवळ पडद्यापुरतीच मर्यादित राहिली. “आमच्यात एक स्पार्क नक्की होता, पण त्याचे कधीही गंभीर नात्यात रूपांतर झाले नाही,” असे त्या म्हणाल्या. यावेळी पूजा यांनी आमिर खानच्या परफेक्शनिस्ट स्वभावाबद्दलही भाष्य केले. “आमिर प्रत्येक गोष्टीची बारकाईने तयारी करतो. चित्रपटातील प्रत्येक गोष्टीत त्याला रस असतो. काहींना ते हस्तक्षेप वाटेल, पण त्यामागे त्याची कामाप्रती असलेली निष्ठा असते,” असे त्यांनी सांगितले.
सेटवरील अनेक आठवणींना उजाळा देताना पूजा म्हणाल्या की, आमिर अनेकदा पात्राच्या लूकपासून ते वेशभूषेपर्यंत सर्व गोष्टींबाबत प्रश्न विचारायचा. “तू इतक्या उंच टाचेच्या चपला का घातल्या आहेत? त्या पात्राला शोभत नाहीत,” असे तो नेहमी म्हणायचा, असे त्यांनी सांगितले.
चित्रपटातील आमिरची प्रसिद्ध टोपीदेखील चर्चेचा विषय ठरली. सुरुवातीला संपूर्ण टीमने त्या टोपीची खिल्ली उडवली होती. “आम्ही त्याला सांगितले होते की ही लहान मुलांची टोपी आहे. पण नंतर तीच टोपी प्रचंड लोकप्रिय झाली आणि बाजारात सर्वत्र दिसू लागली,” असे पूजा यांनी सांगितले. विशेष म्हणजे ही टोपी आमिरने त्याचा पुतण्या इम्रान खान याच्याकडून घेतली होती. आमच्या मैत्रीचे वर्णन करताना पूजा म्हणाल्या, “आम्ही एकमेकांची सतत मस्करी करायचो. आमचे नाते अगदी ‘टॉम अँड जेरी’सारखे होते. तो नेहमीच बरोबर असायचा असे नाही आणि आम्ही त्याला ते सांगायलाही मागेपुढे पाहत नव्हतो.” दरम्यान, Dil Hai Ke Manta Nahin च्या काळात आमिर खान यांचा विवाह रीना दत्ता यांच्याशी झाला होता. त्यानंतर त्यांनी किरण राव यांच्यासोबत संसार थाटला. सध्या आमिर खान यांचे नाव गौरी स्प्रॅट यांच्यासोबत जोडले जात आहे.






