(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)
लोककलेसाठी आपले आयुष्य समर्पित केलेल्या संगीत नाटक अकादमी, राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त महाराष्ट्र शिरोमणी लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित १५ वा लोकशाहीर विठ्ठल उमप स्मृती संगीत समारोह आणि ‘मृदगंध पुरस्कार २०२५’ च्या दिमाखदार समारंभात विविध क्षेत्रातील मान्यवरांना सन्मानित करण्यात आले.
पुरस्कार वितरणाच्या समारंभात गझलनवाझ भीमराव पांचाळे यांनी त्यांच्या भावना व्यक्त करत सांगितले, “मी मातीतला माणूस असून, लोककलेने माझे भरणपोषण केले. आज लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्या नावाचा जीवनगौरव पुरस्कार मिळत असल्याचा आनंद अनमोल आहे. ‘निहाल हो गयी जिंदगी मेरी’ अशा शब्दांत मी आपली कृतज्ञता व्यक्त करतो.”
आपले अवघे आयुष्य लोककलेसाठी समर्पित करणाऱ्या संगीत नाटक अकादमी, राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त महाराष्ट्र शिरोमणी लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी विविध क्षेत्रातील मान्यवरांना ‘मृद्गंध पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येते. यावर्षीच्या मृदगंध पुरस्कार विजेत्यांमध्ये शाहीर श्राजेंद्र राऊत (लोककला क्षेत्र),प्रदीप शिंदे (शिल्पकला), अभिनेते जयवंत वाडकर (अभिनय क्षेत्र), परेश मोकाशी (दिग्दर्शक), श्रीमती मधुगंधा कुलकर्णी (अभिनेत्री आणि निर्माती), अभिनेत्री रिंकू राजगुरू (नवोन्मेष प्रतिभा-अभिनय क्षेत्र) यांना ‘मृद्गंध पुरस्कार २०२५’ देऊन सन्मानित करण्यात आले. लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्या नावाचा हा पुरस्कार आमच्यासाठी लाखमोलाचा असल्याची भावना मान्यवर पुरस्कार विजेत्यांनी व्यक्त केली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड.आशिष शेलार, अर्थतज्ज्ञ-माजी खासदार भालचंद्र मुणगेकर, भाजपचे मुंबई अध्यक्ष आमदार अमित साटम, यांच्यासह संगीत-अभिनय क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती.
लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्या स्मरणार्थ आयोजित मृदगंध पुरस्कार समारंभात, त्यांच्या चिरंजीव, प्रसिद्ध गायक आणि विठ्ठल उमप फाऊंडेशनचे अध्यक्ष नंदेश वत्सला विठ्ठल उमप यांनी उपस्थितांचे आभार मानले, “रसिक मायपाब आणि कुटुंबाच्या साथीने मी माझ्या बाबांना आठवणीतून जिवंत ठेवू शकलो. बाबांच्या स्मरणार्थ दिल्या जाणाऱ्या या पुरस्काराच्या निमित्ताने आपले ऋणानुबंध आणि रसिकांचे प्रेम आमच्यावर असंच कायम राहू द्या.”
या वेळी सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार यांनीही भाष्य केले,“लोकशाहीर विठ्ठल उमप यांचा पहाडी आवाज हा महाराष्ट्राच्या चळवळीचा आवाज होता. वंचितांच्या आवाजाचं प्रतिनिधित्व करत त्यांनी लोककलेच्या माध्यमातून जो संघर्ष उभा केला, ते अत्यंत कौतुकास्पद आहे. आता नंदेश त्यांच्या कार्याला ज्या पद्धतीने पुढे नेत आहेत आणि उत्कृष्ट कलाकारांना पुरस्काराद्वारे कौतुकाचं बळ देत आहेत, ते नक्कीच अभिनंदनीय आहे.”
समाजातील कलावंतांच्या योगदानाचा उल्लेख करत अर्थतज्ज्ञ आणि माजी खासदार भालचंद्र मुणगेकर म्हणाले, “आपल्या भौतिक गरजा भागल्या की आपलं आयुष्य समृद्ध होतं असं नाही. सामाजिक आरोग्यासाठी कला तितकीच महत्त्वाची असते. ती जपण्याचं, वाढवण्याचं काम हे कलावंत सातत्याने करत आहेत. त्यांच्या योगदानाबद्दल मी मनापासून आभार व्यक्त करतो.”
मराठमोळ्या रोहित राऊतने मारली बाजी; भारताचा पहिला I-Popstar म्हणून देशभरात उमटवला ठसा






