राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चेला अखेर पूर्णविराम; शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा 'हा' प्लॅन समोर (संग्रहित फोटो)
मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांच्या विलिनीकरणाच्या मुद्द्याला पूर्णविराम मिळाल्याचे संकेत दिसून आले. त्याऐवजी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष संघटना बळकट करण्यावर भर देत असल्याचे चित्र आहे. तीन दिवसांपासून मुंबईत पक्षाच्या संघटनात्मक बैठकींचे सत्र सुरू होते.
बैठकीत राष्ट्रीय कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे आणि प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या होत्या. विलिनीकरणाच्या चर्चाकडे दुर्लक्ष करून राज्यात पक्ष कसा मजबूत होईल आणि संघटना कशी वाढवता येईल यावर लक्ष केंद्रित करण्याचे निर्देश देण्यात आले होते. या बैठकीत पुढील वर्षभराच्या कार्यक्रमांचे नियोजन करण्यासोबतच सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेण्याचेही ठरवण्यात आले होते. मे महिन्यात जिल्हाध्यक्षांचे, सर्व तालुकाध्यक्षांचे शिबिर आयोजित करणार आहे.
पक्ष संघटना मजबूत करण्याची प्रक्रिया सुरू
शशिकांत शिंदे यांनी सांगितले होते की, पक्ष संघटना मजबूत करण्याची प्रक्रिया सुरू होती आणि त्याअंतर्गत मागील आठवड्यात जिल्हास्तरीय बैठका घेण्यात आल्या होत्या. सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत विविध सेलच्या बैठका सुरू होत्या. सक्षम कार्यकर्त्यांची नियुक्ती करण्यात येत होती आणि महाराष्ट्रभर दौरे करण्याचे नियोजन करण्यात आले होते.
विविध प्रश्नांवर राष्ट्रवादी आक्रमक
राज्यातील विविध प्रश्नांवर आक्रमकपणे रस्त्यावर उतरून भूमिका मांडणारा पक्ष म्हणून पुढे येण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला होता. निवडणूक प्रक्रियेच्या धावपळीमुळे प्रलंबित राहिलेले संघटनात्मक निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
Sunetra Pawar PC : दादांचा एकही शब्द खाली पडू देणार नाही! सुनेत्रा पवारांनी दिलं बारामतीकरांना वचन
अजित पवारांच्या निधनानंतर विलीनीकरणाच्या चर्चा
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चां सुरू झाल्या होत्या. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या नेत्याशी चर्चा सुरू असल्याचेही बोलले जात होते. अशातच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत आपल्याला आधीच माहिती होते, असा दावा काही दिवसांपूर्वी केला. एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा दावा केल्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.






