पावसाळी अधिवेशनाची तारीख ठरली! २२ जून ते १० जुलै दरम्यान मुंबईत पार पडणार
महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन २२ जून ते १० जुलै २०२६ या कालावधीत मुंबई येथे आयोजित करण्यात येणार आहे. विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
विधानभवन येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीस विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक सदस्य आणि विविध पक्षांचे आमदार उपस्थित होते.
उच्च व तंत्र शिक्षण तसेच संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, आमदार सुधीर मुनगंटीवार, दीपक केसरकर, नाना पटोले, जयंत पाटील, डॉ. नीलम गोऱ्हे, अनिल परब, प्रसाद लाड, हेमंत पाटील, प्रवीण दरेकर, विक्रम काळे आणि सतेज पाटील यांच्यासह विधिमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे व संबंधित वरिष्ठ अधिकारी बैठकीला उपस्थित होते.
महावितरणच्या आडमुठ्या धोरणामुळे १४ कोटींची ‘जलजीवन योजना’ रखडली; मसूर गावात पाण्यासाठी भटकंती
बैठकीदरम्यान पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजाचे नियोजन, संभाव्य विधेयके, विविध शासकीय कामकाज तसेच अधिवेशनाचा कार्यक्रम याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. राज्यातील विविध महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा, विधेयकांचे सादरीकरण आणि लोकहिताच्या विषयांवर सत्ताधारी व विरोधी पक्षांमध्ये जोरदार चर्चा होण्याची शक्यता या अधिवेशनात आहे.
राज्याच्या राजकीय घडामोडी, विकासकामे, शेतकरी, पायाभूत सुविधा आणि इतर महत्त्वाच्या विषयांवर सरकारची भूमिका मांडण्याबरोबरच विरोधकांकडूनही विविध मुद्द्यांवर सरकारला घेरण्याची तयारी सुरू असल्याने आगामी पावसाळी अधिवेशनाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.






