'ऑपरेशन टायगर'वर शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान; म्हणाले, 'ठाकरे गटात घुसमट होत असल्याने खासदार, आमदार...' (फोटो - सोशल मीडिया)
नागपूर : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहे. त्यातच ठाकरेंच्या शिवसेनेत फूट पडण्याची शक्यता आहे. असे असतानाच आता ‘ऑपरेशन टायगर‘ची निव्वळ चर्चा नाही तर, ७ खासदार आमच्या संपर्कात आहेत. कोणत्याही ऑपरेशनपूर्वी विविध चाचण्या घेतल्या जातात. तशा सर्व चाचण्या झाल्या असून, तारीख निश्चित व्हायची आहे. येत्या पंधरवड्यात चित्र बदललेले दिसेल, असा दावा शिवसेना शिंदे गटाचे आमदार कृपाल तुमाने केला.
पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. तृणमूल काँग्रेसचा विधानसभा निवडणुकीत झालेला पराभव हे त्यामागचे महत्त्वाचे कारण मानले जाते. अनेक आमदार-खासदार भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा आहेत. त्यातच महाराष्ट्रातही ठाकरे गटाला धक्का बसणार असल्याचे बोलले जात आहे. राज्यात परत ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी पक्षाच्या खासदारांशी संवाद साधला. काही खासदार ऑनलाईन सहभागी झाले होते. या माध्यमातून ठाकरे गटाने चर्चेला विराम देण्याचा प्रयत्न केल्यानंतर लगेच कृपाल तुमाने यांनी ‘ऑपरेशन टायगर’चा दावा करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवली.
शिवसेना ठाकरे गटात घुसमट, त्रास होत असल्याने खासदार, आमदार आमच्या संपर्कात आहेत. ठाकरे गटाच्या शिवसेनेचे भवितव्य अंधःकारमय असल्याची जाणीव सर्वांनी झाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर विश्वास ठेवून शिंदे गटात सहभागी होण्याची तयारी आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत राहण्याचा सर्वांनी निर्णय घेतला. पंधरवड्यात चित्र स्पष्ट होईल, असेही तुमाने यांनी म्हटले आहे.
खासदार-आमदार ठाकरेंवर नाराज
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खासदारांनी उघडपणे त्यांच्या पक्षाच्या नेतृत्वावर आरोप लावला होता. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे खासदारांना भेटत नाही, अशी नाराजी खासदारांनी काही दिवसांपूर्वी बोलून दाखवली होती. नुकताच पार पडलेल्या नगर परिषदा, महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडले आणि प्रचाराला गेले नाहीत. त्यामुळेही ठाकरेंवर खासदार, आमदार आणि पदाधिकारी प्रचंड नाराज असल्याचा दावा निरुपम यांनी केला.






