Rahul Gandhi PC: माईक बंद कराल, पण विद्यार्थ्यांचा आवाज नाही!; संसदेत बोलू न दिल्याने राहुल गांधींचा आरोप
Rahul Gandhi PC: लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावर झालेल्या पोलिस कारवाईचा मुद्दा संसदेत उपस्थित केल्याचा दावा करत, भारतीय जनता पक्षाने आपल्याला बोलू दिले नाही, असा आरोप केला आहे. याबाबत त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ वर पोस्ट करत संध्याकाळी 6 वाजता पत्रकार परिषद घेणार असल्याची घोषणा केली.
राहुल गांधी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे, “आज संसदेतील माझ्या भाषणादरम्यान मी दिल्लीतील विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित क्रूर कारवाईचा मुद्दा उपस्थित केला आणि त्यासाठी जबाबदार असल्याचा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर केला. मात्र, भाजपने मला बोलू दिले नाही. आज सायंकाळी 6 वाजता मी पत्रकार परिषद घेणार असून, संसदेत मला जे बोलू दिले गेले नाही, ते सर्व देशासमोर मांडणार आहे. माईक बंद करता येईल, पण विद्यार्थ्यांचा आवाज दाबता येणार नाही.” दरम्यान, राहुल गांधी यांच्या या आरोपांवर भारतीय जनता पक्ष किंवा केंद्र सरकारकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही.
पेपरफुटीशी संबंधित ‘परीक्षा सुधारणा विधेयक, २०२६’ वरील चर्चेदरम्यान, विरोधी पक्षनेते राहुल गांधीनी थेट केंदीय गृहमंत्री अमित शाहांवर गंभीर आरोप केले. सत्ताधारी पक्षाच्या खासदार चांगलेच भडकले होते. गेल्या आठवड्यात झालेल्या विद्यार्थ्याच्या संसद मार्चदरम्यान शेकडो विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्यात आला. अनेक ठिकाणी पॅलेटगन आणि गोळीबाराच्याही घटना उघडकीस आल्या. याच मुद्द्यावरून राहुल गांधींनी थेट, “गृहमंत्री अमित शाह यांनी विद्यार्थ्यांवर गोळीबार करण्याचे आदेश दिले होते.” असा गंभीर आरोप केला.
राहुल गांधी म्हणाले की, “गृहमंत्री अमित शाह यांच्यात सभागृहात येऊन बसण्याचे धाडस नाही. मी त्यांना ३० गाड्यांच्या ताफ्यात थरथर कापत बसलेले पाहिले. गृहमंत्री आज इथे का नाहीत? अमित शाह यांनी विद्यार्थ्यांवर गोळीबार करण्याचे आदेश दिले होते.” राहुल गांधीच्या या आरोपांमुळे सभागृहात एकच गोंधळ उडाला. सत्ताधारी भाजप खासदारांनी राहुल गांधींकडे माफी मागावी, अशी मागणी केली.
राहुल गांधी म्हणाले, “मी काही विद्यार्थ्यांशी बोललो मी त्यांना विचारले की विद्यार्थी असण्याचा अर्थ काय असतो. त्या मुलीने एक सुंदर उत्तर दिले. ती म्हणाली, ‘विद्यार्थी म्हणजे अशी व्यक्ती, जिचे मन आणि हृदय खुले असते. विद्यार्थ्यांना माहित असते की त्यांना अजून शिकायचे आहे आणि हे विश्व सतत बदलत असते. त्यामुळे, त्यांचा असा विश्वास असतो की ज्ञानही सतत बदलत असते.” असं उत्तर विद्यार्थ्यांनी दिल्याचे त्यांनी सांगितले.
जंतर मंतर येथील कॉकरोच जनता पक्षाच्या आंदोलनाबाबत राहुल गांधी म्हणाले, “मी खूप उत्साहित झालो होतो. देशाच्या भविष्याने आपल्या रस्त्यांवर जे दाखवून दिले, त्याने माझा आत्मविश्वास वाढवला. हा राग नव्हता, हिंसा नव्हती, द्वेष नव्हता. ही या देशातील तरुणांची, या देशाच्या भावी पिढीची एक सखोल अभिव्यक्ती होती. भाजपमधील माझ्या मित्रांसहित सर्व राजकीय पक्षांनी या अभिव्यक्तीचा आदर केला पाहिजे.” असही राहुल गांधींनी नमुद केलं.






