'राजकारण हा अभिजीत दिपकेच्या विषय नाही'; मंत्री संजय शिरसाटांचा मोठा दावा (Photo Credit- X)
नीट पेपरफुटी प्रकरणाविरोधातील आंदोलनामुळे चर्चेत आलेल्या अभिजीत दिपके यांच्याबाबत राज्याचे मंत्री आणि शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे. अभिजीत दिपके यांना काही जण राजकारणात आणण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला असून, राजकारण हा दिपके किंवा त्यांच्या कुटुंबाचा विषय नसल्याचेही स्पष्ट केले आहे.
छत्रपती संभाजीनगर येथे अभिजीत दिपके यांच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर संजय शिरसाट यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी सांगितले की, दिपके कुटुंबाशी त्यांचे अनेक वर्षांचे कौटुंबिक संबंध आहेत. “अभिजीतला मी लहानपणापासून ओळखतो. माझा मुलगा त्यांच्या बहिणीकडून राखी बांधून घेतो. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाची भेट घेणे हे नैसर्गिक होते,” असे त्यांनी नमूद केले.
शिरसाट यांनी स्पष्ट केले की, आंदोलन सुरू असताना त्यांनी दिपके यांच्या घरी भेट दिली असती, तर त्याचा चुकीचा राजकीय अर्थ काढला गेला असता. त्यामुळे आंदोलन संपल्यानंतरच त्यांनी कुटुंबीयांची भेट घेतल्याचे त्यांनी सांगितले.
अभिजीत दिपके यांनी माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांची भेट घेतल्यानंतर त्यांना विरोधी पक्षांकडून राजकारणात येण्याची ऑफर मिळाल्याच्या चर्चांवरही शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांच्या मते, अभिजीत यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी भावनिक भूमिकेतून आंदोलन केले. मात्र, त्यांच्या आई-वडिलांची इच्छा मुलाने नोकरी करून स्थिर आयुष्य जगावे, अशी असल्याचे त्यांनी सांगितले.
राजकारणात प्रवेश करायचा की नाही, हा पूर्णपणे अभिजीत दिपके यांचा वैयक्तिक निर्णय असल्याचे सांगतानाच, काही लोक त्यांना बळजबरीने राजकारणात आणण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप शिरसाट यांनी केला. तसेच दिपके यांच्या नावाचा वापर करून काही जण राजकीय लाभ मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचाही दावा त्यांनी केला.
दिल्लीतील आंदोलनानंतर महाराष्ट्रात काही ठिकाणी पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आल्याचा उल्लेख करत, त्या घडामोडींवरही शिरसाट यांनी नाराजी व्यक्त केली. त्यांच्या या वक्तव्यामुळे अभिजीत दिपके यांच्या पुढील राजकीय वाटचालीबाबतच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे.






