धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतरही कॉकरोच जनता पार्टीचा आंदोलनाचा इशारा! (Photo credit - Social Media)
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतरही विद्यार्थी आंदोलकांवरील कारवाईचा मुद्दा कायम असल्याचा आरोप करत कॉकरोच जनता पार्टीने केंद्र सरकारला पुन्हा एकदा थेट इशारा दिला आहे. आंदोलकांवर कोणतीही पोलीस कारवाई केली जाणार नाही, या कराराचे उल्लंघन होत असल्याचा दावा CJP च्या वतीने केला असून, विद्यार्थ्यांवरील गुन्हे तातडीने मागे न घेतल्यास पुन्हा आंदोलनाला बसावे लागेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
कॉकरोच जनता पार्टीच्या म्हणण्यानुसार, बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये शेकडो विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली आहे. तसेच दिल्लीसह इतर काही राज्यांमध्ये आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून नजर ठेवली जात असून त्यांना त्रास दिला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. दिल्लीत आंदोलकांना रसद आणि अन्य मदत पुरवणाऱ्या स्वयंसेवकांनाही ताब्यात घेतल्याच्या बातम्या समोर येत असल्याचा दावा पक्षाने केला आहे.
दरम्यान, पक्षाचे प्रवक्ते आशुतोष रांका यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर पोस्ट करत केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा आणि जितेंद्र सिंह यांना टॅग केले आहे. त्यांनी आंदोलकांवरील सर्व एफआयआर तात्काळ मागे घेण्याची मागणी केली आहे. तसेच अटक करण्यात आलेल्या सर्व विद्यार्थ्यांची त्वरित सुटका करण्यात यावी, असेही त्यांनी म्हटले आहे.
याशिवाय, दिल्ली पोलिसांसह केंद्रीय तपास यंत्रणा किंवा भाजपशासित राज्यांतील पोलिसांकडून भविष्यात आंदोलनाशी संबंधित कोणतेही नवीन गुन्हे दाखल करू नयेत, अशी मागणीही करण्यात आली आहे. कायदेशीर प्रकरणांबाबत झालेला लेखी करार आणि भारत सरकारने निश्चित केलेली कालमर्यादा उद्यापर्यंत लेखी स्वरूपात द्यावी, अशी मागणीही पक्षाने केली आहे.
Dear @JPNadda @DrJitendraSingh ji, We are observing a complete breach of the agreement regarding no police action against the protestors. Hundreds of students have been arrested in Bihar and Bengal, and hundreds are being surveilled/harrassed in Delhi and other states. Multiple… — Ashutosh Ranka (@AshutoshRanka) July 27, 2026
विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेण्याबाबत सरकारकडून चालढकल होत असल्याचा आरोप करत, जर सर्व मागण्या मान्य झाल्या नाहीत तर पुन्हा एकदा उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा स्पष्ट आणि गर्भित इशारा कॉकरोच जनता पार्टीने दिला आहे. त्यामुळे धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतरही या आंदोलनाचा पुढील टप्पा काय असेल, याकडे देशभरातील विद्यार्थ्यांचे आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
देशाच्या विविध भागांतील विद्यार्थी आंदोलनादरम्यान दिल्ली पोलिसांनी कथितरित्या केलेल्या अतिबळाच्या वापराबाबत सर्वोच्च न्यायालयाने कठोर भूमिका घेतली आहे. सुनावणीदरम्यान न्यायालयाने स्पष्ट शब्दांत सांगितले की, केवळ आंदोलन सुरू आहे म्हणून पोलिसांना थेट लाठीचार्ज करण्याचा अधिकार मिळत नाही. कोणतीही कारवाई करताना परिस्थितीचा सखोल विचार करून कायद्याने निर्धारित केलेल्या प्रक्रियेचे पालन करणे आवश्यक आहे. भारताचे सरन्यायाधीश (CJI) सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने ही टिप्पणी केली. यापैकी एक याचिका विद्यार्थ्यांच्या एका गटाने दाखल केली होती, ज्यात त्यांनी आरोप केला होता की आंदोलनादरम्यान पोलिसांनी त्यांना मारहाण केली.






