मुख्यमंत्र्यांच्या भेटीवरून सुनेत्रा पवार नाराज? सुनील तटकरे यांनी दिलं स्पष्ट उत्तर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि वरिष्ठ नेते प्रफुल पटेल यांनी घेतलेल्या भेटीनंतर राज्याच्या राजकारणात विविध चर्चांना उधाण आले होते. राज्यातील राजकीय वातावरणात आधीच मोठ्या घडामोडी घडत असताना या भेटीमुळे अनेक तर्कवितर्क लावण्यात येत होते. या भेटीबाबत सुनेत्रा पवार यांना माहिती नव्हती आणि त्या नाराज आहेत, अशा चर्चादेखील रंगल्या होत्या. मात्र, या सर्व चर्चांवर आता सुनील तटकरे यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे.
पत्रकारांशी बोलताना सुनील तटकरे म्हणाले की, “जयंत पाटील आणि आमची वर्षा बंगल्यावर एकत्र भेट झाली नव्हती. जयंत पाटील त्यांच्या मतदारसंघातील अपात्र नगराध्यक्षांच्या प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी गेले होते,” अशी माहिती त्यांनी दिली.
जयंत पाटील-एकनाथ शिंदे भेटीवर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; ‘रामदास आठवलेंना भेटले तर…’
तटकरे यांनी सांगितले की, त्यांनी आणि प्रफुल पटेल यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे गेल्या आठवड्यातच वेळ मागितली होती. संसद अधिवेशन सुरू होण्यापूर्वी केंद्र सरकारकडे पाठवायच्या विविध प्रस्तावांबाबत चर्चा करण्यासाठी ही भेट आयोजित करण्यात आली होती. ते म्हणाले, “दापोली पर्यटन विकासासह काही महत्त्वाचे प्रस्ताव राज्य सरकारमार्फत केंद्राकडे पाठवायचे आहेत. त्यासाठी संबंधित केंद्रीय मंत्र्यांशी समन्वय साधायचा होता. मुख्यमंत्री उपलब्ध असल्याने त्यांनी आम्हाला भेटीसाठी वेळ दिला.”
सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले की, “जर ही राजकीय भेट असती तर त्याबाबत निश्चितच सुनेत्रा पवार यांना माहिती दिली गेली असती. मात्र ही भेट पूर्णपणे प्रशासकीय आणि विकासकामांसाठी होती.”
कोअर कमिटी बैठकीचाही उल्लेख करत तटकरे म्हणाले की, बैठकीत मतदार यादी विशेष पुनरावलोकन (SIR), स्वर्गीय आर. आर. पाटील यांच्या जयंतीचे नियोजन आणि इतर संघटनात्मक विषयांवर चर्चा झाली. सुनेत्रा पवार यांच्याबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले, “वहिनी (सुनेत्रा पवार) आमच्या नेत्या आहेत. अजितदादांबद्दल आमच्या मनात जो आदर आहे, तोच आदर सुनेत्रा पवार यांच्याबद्दलही आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस नेटाने पुढे वाटचाल करत आहे.”






