'ममतांसारखीच परिस्थिती उद्धव ठाकरेंच्या पक्षाची होईल'; राज्यमंत्री आशिष जायस्वाल यांची टीका
नागपूर : काँग्रेसच्या संपर्कात आल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत पूर्णपणे मानसिक दिवाळखोर झाले आहेत, असा हल्लाबोल राज्यमंत्री आशिष जायसवाल यांनी राऊत यांच्यावर चढवला. नागपूरमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ठाकरे गटाच्या अस्तित्वावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. संजय राऊत यांनी पश्चिम बंगालमधील निवडणूक निकालावर म्हटले होते की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पतनाची सुरुवात झाली आहे आणि म्हणीचा संदर्भ देत त्यांनी सांगितले की, दिवा विझण्यापूर्वी त्याची ज्योत तेज होते. त्यांच्या या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना जायस्वाल यांनी त्यांना भ्रष्ट बुद्धीचे जिवंत उदाहरण म्हटले.
आशिष जायस्वाल यांनी दावा केला की, संजय राऊत जाणूनबुजून शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न करत आहेत. ज्याप्रकारे पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या हिंदूविरोधी भूमिकेमुळे जनतेने त्यांना नाकारले, तशीच परिस्थिती महाराष्ट्रात शिवसेना (उबाठा) ची होईल.
कृषी संकटावर मात करण्यास सरकार सज्ज
राज्यातील कृषी संकटाबाबत त्यांनी सांगितले की ‘अल निनो ‘च्या प्रभावामुळे पाऊस कमी झाला तरी सरकार परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज आहे. धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असून प्रशासनाला सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. रासायनिक खतांच्या काळाबाजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी शेतकऱ्यांना गरजेपेक्षा अधिक खरेदी न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. राज्यातील महिला अत्याचारांच्या वाढत्या घटनांबाबत चिंता व्यक्त करत त्यांनी सांगितले की आरोपींना कठोर शिक्षा मिळावी यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.
ठाकरेंचा विदर्भावर अन्याय
उद्धव ठाकरे यांच्या काळात विदर्भावर अन्याय झाल्याचा आरोप करत जायसवाल म्हणाले की, ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली विदर्भातील एकाही कार्यकर्त्याला विधान परिषदेत संधी मिळाली नव्हती. एकनाथ शिंदे यांनी कृपाल तुमाने आणि भावना गवळी यांना संधी देऊन विदर्भाचा सन्मान राखला. मंत्रिमंडळातील फेरबदलाबाबत त्यांनी स्पष्ट केले की, शिंदे आमचे सर्वोच्च नेते आहेत आणि कोणाला कोणते मंत्रालय द्यायचे, हा त्यांचा विशेषाधिकार आहे. मला कॅबिनेट मंत्रिपदाबाबत कोणतेही आश्वासन देण्यात आलेले नाही.






