जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशी राजकीय विरोधक असलेले आमदार भास्कर जाधव आणि आमदार शेखर निकम अनावधानाने आमनेसामने आले होते. त्या भेटीत कटुता नव्हे तर सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन घडले. दिलखुलास संवाद आणि सौजन्यपूर्ण वागणुकीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्यावेळी ती केवळ ‘औपचारिक भेट’ मानली गेली असली, तरी आता तीच भेट सत्तेच्या दिशेने जाणारा पहिला इशारा ठरतेय का, असा सवाल उपस्थित होत आहे.
आकडेमोड राष्ट्रवादीच्या बाजूने, पण सत्ता स्थापनेसाठी पाठिंबा गरजेचा
चिपळूण पंचायत समितीतील 18 गणांपैकी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) 7 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. शिवसेना (उबाठा) गटाला 4, युतीतील शिवसेना शिंदे गटाला4आणि भाजपला 3 जागा मिळाल्या आहेत. एकट्या राष्ट्रवादीकडे बहुमत नसल्याने सत्ता स्थापनेसाठी अन्य पक्षांची साथ अपरिहार्य ठरते.
नगरपालिकेचा अनुभव आणि ‘एकला चलो’ची भूमिका
चिपळूण नगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेना-भाजप युती झाल्याने राष्ट्रवादीला बाहेर ठेवण्यात आले होते. त्याचा मोठा फटका राष्ट्रवादीला बसला आणि केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले. त्या कटू अनुभवातून बोध घेत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका राष्ट्रवादीने स्वतंत्र ताकदीवर लढवण्याचा निर्धार केला. आमदार शेखर निकम यांनी कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करत ‘एकला चलो’ची भूमिका घेतली.
संकटातही संयम, प्रचाराची वेगळी वाट
निवडणूक प्रचार अंतिम टप्प्यात असतानाच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाने राष्ट्रवादी पक्षावर दुःखाचा डोंगर कोसळला. आमदार शेखर निकम यांच्यासाठी तो मोठा मानसिक आघात होता. मात्र त्यातून सावरत त्यांनी कोणतीही भव्य सभा, स्टार प्रचारक किंवा वरिष्ठ नेत्यांची उपस्थिती न घेता, केवळ ‘डोअर टू डोअर’ प्रचारपत्रकांच्या माध्यमातून प्रचार केला. हीच प्रचारशैली मतदारांच्या मनाला भिडली, असे निकालातून स्पष्ट झाले. दुसरीकडे, युतीच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चिपळूणमध्ये जाहीर सभा घेतली. मात्र यावेळी त्यांची जादू फारशी चालली नाही. निकालात शिवसेना शिंदे गटाला ४ आणि भाजपला ३ जागांवरच समाधान मानावे लागले.
उबाठा गटाची ताकद कायम, जाधवांचे नेतृत्व ठळक
शिवसेना (उबाठा) गटानेही आपली ताकद सिद्ध करत ४ जागा जिंकल्या. आमदार भास्कर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली लढवलेल्या निवडणुकीत पक्षाने आपली स्वतंत्र ओळख कायम ठेवली. राष्ट्रवादीच्या यशाबद्दल उबाठा गटाने खुलेपणाने कौतुक केले असून, पंचायत समितीत राष्ट्रवादीचाच सभापती बसावा, अशी भूमिका देखील अप्रत्यक्षपणे मांडली आहे.
सत्तास्थापनेसाठी नवी युती?
नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांतील कटू अनुभव पाहता आमदार शेखर निकम युतीच्या मदतीने सत्ता स्थापन करतील, असे सध्या तरी वाटत नाही. मात्र राष्ट्रवादीचा सभापती आणि समान भूमिकेवर सहमत असलेल्या पक्षांसोबत सत्ता स्थापन केली जाईल, असे संकेत मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उबाठा) आणि राष्ट्रवादी एकत्र येऊन पंचायत समितीत सत्ता स्थापन करतील, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.चिपळूणच्या राजकारणात निर्णायक क्षण एकेकाळचे राजकीय विरोधक असलेले आमदार भास्कर जाधव आणि आमदार शेखर निकम जर एकत्र आले, तर चिपळूणच्या राजकारणात तो मोठा टर्निंग पॉईंट ठरणार आहे. ‘ती’ भेट पुढे सत्तेची ‘गोड’ सुरुवात ठरते की नाही, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार असले तरी चिपळूणवासियांची उत्सुकता मात्र शिगेला पोहोचली आहे. “






