सामना अग्रलेखातील टीकेला वंचित बहुजन आघाडीने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे (फोटो - सोशल मीडिया)
पुणे : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) चे मुखपत्र असलेल्या ‘सामना’मधून राज्यातील राजकारण्यांवर जोरदार हल्लाबोल करण्यात येतो. काल (दि. 14 एप्रिल) रोजी एक राजकीय अग्रलेख प्रकाशित करण्यात आले होते. या अग्रलेखात वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली होती. यावरुन वंचित बहुजन आघाडी आक्रमक झाली आहे. त्यांनी देखील शिवसेना ठाकरे गटाला खडेबोल सुनावले आहेत. प्रकाश आंबेडकरांवर टीका करण्यापूर्वी शिवसेनेने स्वतःचे चारित्र्य तपासावे, अशा शब्दांत वंचित बहुजन आघाडीने प्रत्युत्तर दिले आहे.
सामनामधून केलेल्या टीकेला वंचित बहुजन आघाडीने तीव्र प्रतिवाद केला आहे. पक्षाचे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी या टीकेला उत्तर दिले आहे. यावेळी त्यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या सामाजिक आणि राजकीय लढ्यांचे उदाहरण देत शिवसेनेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तसेच शिवसेना ठाकरे गटाचा सर्व इतिहास सांगत हल्लाबोल केला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
वंचित बहुजन आघाडीचे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी पत्रकार परिषद घेत त्यांचे मत स्पष्ट केले. ते म्हणाले की, “फुले चित्रपटावर ब्राह्मण संघटनांकडून विरोध झाल्यानंतर बाळासाहेब आंबेडकर हे एकमेव नेते होते ज्यांनी या चित्रपटाच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरून आंदोलन केले. त्यांनी सेन्सॉर बोर्डाच्या निर्णयाला विरोध करत चित्रपटातील महत्त्वाच्या दृश्यांच्या कापणीविरोधात ठाम भूमिका घेतली. या संघर्षात महाविकास आघाडीतील कोणताही पक्ष सहभागी झाला नव्हता,” असे मत पक्षाच्या प्रवक्त्यांनी मांडले आहे.
सिद्धार्थ मोकळे यांनी शिवसेनेच्या इतिहासावर प्रकाश टाकत हल्लाबोल केला. ते म्हणाले की, “शिवसेना 25 वर्षे भाजपसोबत युतीत होती आणि गोध्रा हत्याकांडाच्या वेळी भाजप व नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी उभी राहिली होती. अशा पक्षाने बाळासाहेब आंबेडकरांसारख्या नेत्यावर टीका करणे हे हास्यास्पद आहे. त्यांनी शिवसेनेला स्वतःचा राजकीय इतिहास तपासण्याचा सल्ला दिला.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले, “बाळासाहेब आंबेडकर हे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात न्यायालयीन, राजकीय आणि सामाजिक स्तरावर लढा देत आहेत. संध्याकाळी सहानंतर झालेल्या मतदानाच्या विरोधात त्यांनी केंद्रातील भाजप सरकारच्या विरोधात न्यायालयीन लढाई सुरू केली आहे. महाराष्ट्रात सोमनाथ सूर्यवंशी या भीमसैनिकाच्या पोलीस कोठडीत झालेल्या हत्येविरोधात त्यांनी रस्त्यावर उतरून आणि न्यायालयात महाराष्ट्रातील भाजप सरकारच्या विरोधात लढा दिला आहे. तसेच, बिहार मधील महायुती सरकारच्या विरोधात महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात यावा यासाठीही त्यांनी लढा दिला आहे,” असे मत सिद्धार्थ मोकळे यांनी व्यक्त केले.
वंचित बहुजन आघाडीने स्पष्ट केले की, “बाळासाहेब आंबेडकर हे जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून लढणारे नेते आहेत. त्यांच्यावर कितीही टीका केली गेली तरी ती सूर्यावर थुंकण्यासारखी आहे. त्यामुळे स्वतःचे चेहरे रंगवून घेणे आता थांबवा. बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर टीका करण्यापूर्वी स्वतःच्या भूमिकेचा पुनर्विचार करावा,” असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी शिवसेना ठाकरे गटाला केले आहे.