स्कॉटलंडमधील ग्लासगो येथे राष्ट्रकुल क्रीडा २०२६ ( Commonwealth Games 2026) च्या स्पर्धेत १ ऑगस्ट हा भारतासाठी एक ऐतिहासिक दिवस ठरला .बॉक्सर आणि वेटलिफ्टिंगसह ॲथलेटिक्समध्येही प्रभावी कामगिरी पाहायला मिळाली. ॲथलेटिक्समध्ये गुलवीर सिंगने इतिहास रचला. गुलवीर सिंग हा ५००० मीटर शर्यतीत १३:२४.९५ अशी वेळ नोंदवून कांस्यपदक जिंकणारा पहिला भारतीय ठरला. तसेच, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ॲथलेटिक्समध्ये एकापेक्षा जास्त पदके जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला. त्याने या स्पर्धेत एक नव्हे तर दोन पदके जिंकून इतिहास रचला. यापूर्वी गुलवीर याने १०,००० मीटर शर्यतीत रौप्य पदक जिंकले होते.
ग्लासगो गेम्सच्या दहाव्या दिवशी, शनिवार, १ ऑगस्ट रोजी ५००० मीटरची शर्यत पार पडली. भारताच्या गुलवीरने सुरुवातीपासूनच आपले मजबूत स्थान टिकवून ठेवले होते. अंतिम फेरीपर्यंत तो पहिल्या पाचमध्ये होता. मग, अंतिम फेरी सुरू होताच, तो क्षणभरासाठी चौथ्या स्थानावरून पाचव्या स्थानावर घसरला. पण शेवटच्या क्षणी २०० ते ३०० मीटरमध्ये केनियाच्या कॉर्नेलियस केम्बोईने त्याला मागे टाकण्याचा जोरदार प्रयत्न केला, पण गुलवीरने हार मानली नाही आणि अखेरीस १३:२४:९५ वेळेत शर्यत पूर्ण करून कांस्यपदक जिंकले. या स्पर्धेत केनियाच्या मॅथ्यू किपसांगने १३:२३:६१ वेळ नोंदवून सुवर्णपदक जिंकले, तर ऑस्ट्रेलियाच्या के रॉबिन्सनने १३:२४:७० वेळ नोंदवून रौप्यपदक जिंकले.
या विजयासह, गुलवीर सिंग ५००० मीटर शर्यतीत राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदक जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला. इतकेच नव्हे तर, एकाच राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत दोन वेगवेगळी ॲथलेटिक्स पदके जिंकणारा तो पहिला भारतीयही ठरला. या यशस्वी शर्यतीच्या चार दिवस आधी, त्याने १०,००० मीटर शर्यतीत रौप्य पदकही जिंकले होते, ज्यामुळे हे पदक जिंकणारा तो पहिला भारतीय ठरला. तिथेही ऑस्ट्रेलियाच्या रॉबिन्सनने त्याला नमवत सुवर्णपदक जिंकले होते.
उत्तर प्रदेशातील अलीगढ जिल्ह्यातील २८ वर्षीय रहिवासी गुलवीर सिंग याने सैन्यात भरती होण्यासाठी धावायला सुरुवात केली आणि २०१८ मध्ये तो भारतीय सैन्यात दाखल झाला. सैन्यात दाखल झाल्यानंतरही त्याने धावणे सुरूच ठेवले, ज्यामुळे गुलवीरला ॲथलेटिक्समध्ये भाग घेण्याची संधी मिळाली. गुलवीरने २०२२ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत १०,००० मीटरच्या शर्यतीत भाग घेऊन कांस्य पदक जिंकले. इतकेच नाही तर, २०२६ मध्ये जेव्हा गुलवीरने हाफ मॅरेथॉन केवळ ५९ मिनिटे आणि ४२ सेकंदात पूर्ण केली, तेव्हा तो एका तासापेक्षा कमी वेळेत ही शर्यत पूर्ण करणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला.






