रॉयस चॅलेंजर्स बंगळुरु सध्या १८ गुण आणि +१.०६५ च्या नेट रन रेटसह अव्वल स्थानी आहे. चेन्नईविरुद्धच्या शानदार विजयामुळे गुजरात संघ १८ गुण +०.६९५ वर पोहोचला आहे. तर हैदराबाद संघ १६ गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहेत. आरसीबीचा शेवटचा साखळी सामना सनरायझर्स हैदराबादविरुद्ध होणार आहे. हैदराबादचा पराभव करुन ते गुणतालिकेत आपले अव्वल स्थान कायम ठेवू शकतात . हा विजय त्यांना २० गुणांपर्यंत नेईल आणि क्वालिफायर १ मधील त्यांचे स्थान निश्चित करेल.
राजस्थान रॉयल्स सध्या चौथ्या स्थानाच्या शर्यतीत सर्वात पुढे आहे. संघाने १३ सामन्यात १४ गुण मिळवले असून त्यांचा नेट रनरेटही चांगला आहे. राजस्थानचा शेवटचा सामना मुंबई इंडियन्सविरुद्ध आहे. हा सामना जिंकल्यास राजस्थान थेट १६ गुणांसह प्लेऑफमध्ये प्रवेश करेल. जर राजस्थानला मुंबईकडून पराभव स्वीकारावा लागला, तर त्यांना इतर संघांच्या निकालांची वाट पाहावी लागेल.
सलग पाच पराभव होऊनही, पंजाब किंग्स स्पर्धेत टिकून आहे. पंजाब किंग्सचा शेवटचा लीग सामना लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध होणार आहे. स्पर्धेतून आधीच बाहेर पडलेल्या एलएसजीवर विजय मिळवल्यास पंजाबला १५ गुण मिळतील. परंतु,क्वालिफाय होण्यासाठी जस्थानने पराभूत होणे आवश्यक आहे म्हणून मुंबईने राजस्थानला पराभूत करावे ही अशी आशा पंजाबला करावी लागेल. तसेच, कोलकात्याच्या निकालावरही पंजाबचे भवितव्य ठरेल. जर पंजाब जिंकला आणि राजस्थान हरला, तर नेट रनरेटचा मोठा प्रभाव पडू शकतो. त्यामुळे पंजाबला केवळ विजयच नव्हे तर मोठ्या फरकाने विजयाची गरज असू शकते.
कोलकाता नाईट रायडर्ससाठी पुढील सामना म्हणजे थेट नॉकआऊट सामनाच आहे. त्यांचा सामना दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध होणार असून पराभूत संघ जवळपास स्पर्धेबाहेर जाणार आहे. कोलकात्याने दिल्लीला हरवल्यास त्यांचे १५ गुण होतील. मात्र त्यानंतर त्यांना राजस्थान आणि पंजाब यांच्या पराभवाचीही अपेक्षा ठेवावी लागेल. जर राजस्थानने मुंबईवर विजय मिळवून १६ गुण गाठले, तर कोलकाताचा प्रवास संपुष्टात येईल. तसेच, जर अनेक संघ 15 गुणांवर पोहोचले, तर अंतिम निर्णय नेट रनरेटवर होईल. त्यामुळे KKR ला मोठ्या विजयाची आवश्यकता आहे.
दिल्ली कॅपिटल्सची परिस्थिती सर्वात कठीण मानली जात आहे. दिल्लीला कोलकात्याविरुद्ध मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागेल. त्यानंतर राजस्थान आणि पंजाब या दोन्ही संघांनी पराभूत होणे आवश्यक आहे. एवढेच नाही तर दिल्लीचा खराब नेट रनरेटही त्यांच्यासाठी मोठी अडचण ठरत आहे.
आता उरलेल्या काही सामन्यांमुळे आयपीएल IPL 2026 मधील प्लेऑफचे चित्र पूर्णपणे बदलू शकते. राजस्थानकडे सर्वात मोठी संधी आहे, पण पंजाब, कोलकाता आणि दिल्ली अजूनही शर्यतीत आहेत. प्रत्येक चेंडू, प्रत्येक धाव आणि नेट रनरेट आता निर्णायक ठरणार आहे. क्रिकेट चाहत्यांसाठी पुढील काही दिवस अत्यंत रोमांचक असणार आहेत.






