मोहम्मद शमी(फोटो-सोशल मीडिया)
Mohammed Shami, Ranji Trophy 2025 :रणजी करंडक २०२५ (Ranji Trophy 2025) स्पर्धेला जोरदार सुरवात झाली आहे. ग्रुप क टप्प्यातील एक रोमांचक सामना उत्तराखंड आणि बंगाल यांच्यात कोलकाता येथे खेळला जात आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात निवड न झालेल्या मोहम्मद शमीने या सामन्यात आपल्या कामगिरीने निवडकर्त्यांवर आपली खुन्नस काढली आहे. गोलंदाज मोहम्मद शमीने धमाकेदार स्पेल टाकत पहिल्या डावात तीन बळी टिपले तर दुसऱ्या डावात अधिक घातक ठरत त्याने चार बळी टिपले आहेत. त्याच्या या कामगिरीने त्याने टिकाकरांना चांगलेच उत्तर दिले.
हेही वाचा : Archery World Cup 2025 : भारताच्या ज्योतीने रचला इतिहास! विश्वचषक अंतिम फेरीत मिळवला ऐतिहासिक विजय
३५ वर्षीय मोहम्मद शमीने पहिल्या डावात एकूण १४.५ षटके गोलंदाजी करत २.४९ च्या इकॉनॉमी रेटने ३७ धावा देत तीन फलंदाज माघारी पाठवले. त्याचे बळी खालच्या फळीतील फलंदाज जन्मेजय जोशी, राजन कुमार आणि देवेंद्र सिंग बोरा हे होते. शमी यावरच समाधानी राहिला नाही तर त्याने दुसऱ्या डावात २४.४ षटके गोलंदाजी केली. यामध्ये त्याने ३८ धावा मोजून चार बळी घेण्याची किमया साधली. यावेळी त्याचे बळी कर्णधार कुणाल चंडेला (७२), अभय नेगी (२८), जन्मेजय जोशी (०४) आणि राजन कुमार (००) हे ठरले आहेत. शमीने पहिल्याच चेंडूवर राजनला माघारी पाठवले.
मोहम्मद शमी भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठी संघर्ष करत असल्याचे दिसत आहे. त्याची तंदुरुस्ती त्याच्या अपयशाचे कारण ठरत आहे. मोहम्मद शमीचा असा विश्वास आहे की तो पूर्णपणे तंदुरुस्त असून भारतीय संघासाठी चमकण्यासाठी सज्ज आहे. परंतु निवडकर्त्यांना वाटते की तो शमी हा अद्याप पूर्णपणे तंदुरुस्त नाही.
म्हणूनच, विराट कोहली आणि रोहित शर्मासारखे अनुभवी खेळाडू ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी संघात परतले असताना, मोहम्मद शमी सारख्या अनुभवी गोलंदाजाकडे मात्र निवडकर्त्यांनी दुर्लक्ष केले आहे. यामुळे, तो आता रणजी ट्रॉफीमध्ये सहभागी झाला आही. त्याने या चालू रणजी ट्रॉफी हंगामात आपल्या कामगिरीने धुमाकूळ घातला आहे.
भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून तिथे भारतीय संघ शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका, तर सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली ५ टी२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. या दौऱ्यावर भारताचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमीला संघात स्थान देण्यात आलेले नाही. त्यावरून त्याने काही दिवसांपूर्वी निवडकर्त्यांवर आरोप करत निशाणा साधला होता.