Maharashtra Budget 2026 : महाराष्ट्र बजेट २०२६ मध्ये देवेंद्र फडणवीसांच्या 10 मोठ्या घोषणा; जाणून घ्या सविस्तर
Maharashtra Budget 2026: महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत अर्थसकंल्पाला मंजुरी देण्यात आली. यामध्ये दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अविरत कार्यासाठी आर्थिक वर्ष २०२६-२७ चे अर्थसंकल्प समर्पित करण्यात आले. तसेच, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी दिलासादायक घोषणा मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत. यामध्ये लाडकी बहीण योजना, ण्यश्लोक अहिल्याबाई होळकर कर्जमाफी योजना यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे यंदाचा अर्थसंकल्प डिजिटल पद्धतीने मांडण्यात येत आहे. तसेच, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांचे स्मारक उभारण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणा:
१) उच्च कुशल रोजगार निर्मितीचे लक्ष: मुंबई आणि पुण्यामध्ये तब्बल ५० अब्ज डॉलरचे रोजगार केंद्र तयार करणार असून सध्या विकसित होत असलेल्या गेमिंग क्षेत्रात अव्वल होण्यासाठी महाराष्ट्रात २९५ पेक्षा जास्त गेमिंग स्टुडिओ तयार करणार तर ४ लाख रोजगार निर्मितीचे प्रयत्न करणार
२) अर्थसंकल्पात मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचा तिसरा टप्पा मंजूर करण्यात आला असून ग्रामसडक योजनेअंतर्गत ३० हजार गावे जोडली गेली आहे. तसेच २४५० किमी रस्त्यांची कामं पूर्ण झाली असून सध्या २३ हजार पूलांचं काम हाती घेतल्याचे सांगितले.
Maharashtra Budget Live: अखेर निर्णय झालाच; फडणवीसांकडून शेतकऱ्यांसाठी ‘इतक्या’ कर्जमाफीची घोषणा
३) राज्यभरातील प्रत्येक जिल्ह्यात सुक्ष्म व लघू केंद्र स्थापन करणार असून ५० लाख प्रत्यक्ष रोजगार निर्माण होणार आहे. प्रधानमंत्री सौर योजनेअंतर्गत रुफ टॉप सोलरला सक्षम केले जाणार आहे तर दुसरीकडे बांबू विकास प्रकल्प वाढवले जाणार आहे. गडचिरोलीत २ लाख कोटींची गुंतवणूक करत नवं स्टील हब म्हणून उदयास येणार आहे.
४) सातारा जिल्ह्यातील वासोटा किल्ला पर्यटकांसाठी रोप वे प्रकल्प उभारणार असून नागपूरमध्ये रामटेक येथे तिसरी चित्रसृष्टी उभारणार आहेत. तसेच महाराष्ट्रातील १२ ज्योतिर्लिंगापैकी ५ ज्योतिर्लिंगाच्या विकासकामांसाठी तरतूद करण्यात आलेले आहे.
५) महाराष्ट्रातील तिसरी आणि चौथी मुंबई म्हणून अनुक्रमे अटल सेतु परिसर (उरण) आणि वाढवण यांच्या विकासासाठी तरतूद करण्यात आली आहे. एमएमआरमध्ये तब्बल १० लाख नवी घरे उभारणार आहेत.
६) मुंबईतील वडाळा ते गेट वे ऑफ इंडिया साठीची मुंबई मेट्रो मार्गिका ११ हा २३ कोटी रुपयांचा पूर्णपणे भूमिगत असलेला प्रकल्प हाती घेण्यात आला असून वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी भुयारी मार्गांचे देखील जाळे विणण्याची योजना केली आहे.
७) २०२५ वर्षाच्या शेवटी नवी मुंबई विमानतळावरुन देशांतर्गत उड्डाणांना सुरू करण्यात आले. सध्या पुरंदर-पुणे विमानतळासाठी भूसंपादन अंतिम टप्प्यात सुरू असून लातूर, बारामती आणि अमरावती विमानतळावर रात्रीच्या उड्डाणांसाठी सुविधा करण्यात येणार आहे. तसेच, राज्यातील शिर्डी, नाशिक, संभाजीनगर, अमरावती, अकोला, रत्नागिरी, यवतमाळ, कराड विमान विस्तारीकरण करण्यावर भर देण्यात येणार आहे.
Maharashtra Budget Live: ‘बळीराजा’ बजेटच्या केंद्रस्थानी; फडणवीसांनी केल्या ‘या’ महत्वाच्या घोषणा
८) महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी विशेष पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर केली असून ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत पीककर्ज थकित असलेल्या शेतकऱ्यांना २ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी मिळणार आहे. तसेच, महाराष्ट्रातील जलमार्गात ३४० किमी जाळे विस्तारणार असून यामुळे विकासाला चालना मिळेल.
९) मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरूच राहणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी अर्थसंकल्पात सांगितले. ८ मार्च ला जागतिक महिला दिनानिमित्त लाडकी बहीण योजनेसाठी भरीव तरतूद करण्यात येईल असेही सांगितले आहे.
१०) पुणे विभागासाठी ५० हजार कोटी रुपयांचे प्रकल्प मंजूर करण्यात आले असून पुणे शिरूर कॉरिडॉरच्या ५४ किलोमीटर प्रवासासाठी ७ हजार ५१५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. तसेच, तळेगाव-चाकण-शिक्रापूर ५३ किलोमीटर साठी ४ हजार कोटी निश्चित आहे. पुणे-सोलापूर साठी हडपसर-यवत ३१ किलोमीटरच्या रस्त्याचा देखील यामध्ये समावेश करण्यात आला आहे. नाशिक फाटा ते खेड या महामार्गासाठी ७ हजार ८०८ कोटी खर्च करण्यात येईल.






