शाळांना ५ दिवसांचा आठवडा लागू करा (Photo Credit- X)
केंद्र सरकारने त्यांच्या अंतर्गत अनेक विभागांना यापूर्वीच पाच दिवसांचा आठवडा केलेला आहे. तसाच आदेश शाळांसाठीही लागू व्हावा. शिक्षण तज्ञ, बाल मानस तज्ञ, मानसोपचार तज्ञ यांनी विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमावरील बोजा तसेच पाठीवरील दप्तराचे ओझे कमी व्हावे यासाठी वेगवेगळ्या उपाययोजनांना सुचवलेल्या आहेत. अभ्यासाचा ताण आणि पाठीवरील दप्तराचे ओझे यामुळे विद्यार्थ्यांचे बालपण कोमेजले जात असून, सुटीमुळे कुटुंबाशी मुलांचे नाते अधिक घट्ट होईल असे समितीने म्हटले आहे. त्याचप्रमाणे शिक्षकांनाही शाळेच्या अध्यापनाबरोबरच बीएलओ, जनगणना, ऑनलाईन कामे व इतर शासकीय कामे करावी लागतात. अशी कामे शाळेच्या वेळेनंतर तसेच शनिवारी रविवारी असतात.
नवीन मतदार नोंदणी कॅम्प व विविध प्रशिक्षणेही शनिवारी, रविवारी होतात. विविध प्रकारची शासकीय कामे, विद्यार्थ्यांची पोर्टलवर माहिती भरणे, पडताळणी करणे, विविध विद्यार्थ्यांचा निकाल, अॅपमध्ये माहिती भरणे, शिष्यवृत्तीचे फॉर्म भरणे, परीक्षेचे फॉर्म भरणे, अशी अनेक कामे शिक्षक हे अध्यापनाच्या कामानंतर तसेच शनिवारी, रविवारी करतात. सर्व शिक्षण नियंत्रण करणाऱ्या अधिकारी यांना यापूर्वीच पाच दिवसांचा आठवडा आहे.
जगातील अनेक देशात शाळांना पाच दिवसांचा आठवडा आहे. जागतिक युद्ध सुरू झाल्यापासून अनेक देशांनी चार ते पाच दिवसांचा आठवडा शाळांना सुरू केलेला आहे. त्यामुळे राज्यातील सर्व प्राथमिक शाळांना जूनपासून पाच दिवसांचा आठवडा सुरू करावी, अशी विनंतीवजा मागणी संघटनेतर्फे दिलीप ढाकणे, प्रसाद म्हात्रे, आर. आर. जोशी, शिवाजी साखरे, रामदास सांगळे, अंकूश काळे, माधव लातुरे, अंजुम पठाण, गिरीश नाईकडे, नितीन कोळी, मुक्ता पवार, दीपा देशपांडे आदींनी केली आहे. निवेदनाची प्रत मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, शिक्षण राज्यमंत्री, ग्रामविकास मंत्री, मुख्य सचिव, शिक्षण प्रश्न सचिव, शिक्षण आयुक्त आदींना सादर करण्यात आली आहे.
शिक्षणातील विविध स्पर्धा यामुळे अनेक विद्यार्थी आत्महत्या करत आहेत. अनेक पालकांना शनिवारी, रविवारी सुट्टी असते. विद्यार्थीदेखील या दिवशी घरी राहतील तर त्यांचा कुटुंबाशी जिव्हाळा वाढेल. मुलांचा अतिरिक्त अभ्यासाचा ताण कमी होईल. विद्यार्थ्यांची पालकांशी असणारे संबंध सुधारतील. मुलांना कौटुंबिक साथ लाभेल. परिणामी विद्यार्थी आत्महत्येचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, असे संघटनेने म्हटले आहे.
शिक्षकांना, विद्यार्थ्यांना शनिवारी अर्धा दिवस सुटी असते. त्यामुळे अर्ध्या दिवसासाठी शिक्षक तसेच विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक आरोग्यासाठी पूर्ण दिवस सुटी महत्त्वाची ठरेल. बालकांचे बालपण हरवले जाणार नाही. अधिकारी, विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी यांच्या शाळेतील येण्या-जाण्याच्या वाहनांचा इंधनाचा खर्च, वीजबिल आदी खर्च वाचेल, असे संघटनेने म्हटले आहे.
छत्रपती संभाजीनगर हादरलं! शिवसेनेच्या नेत्यावर चाकूने हल्ला; भेटायला बोलावलं अन्…






