फोटो सौजन्य- सोशल मीडिया
Experiential Learning: भारतात शिक्षणाचा अर्थ प्रदीर्घ काळापासून केवळ वर्गखोली, फळा आणि जाड पुस्तकांपुरताच मर्यादित मानला गेला. परंतु, आता देशातील काही शाळा ही विचारसरणी पूर्ण पणे बदलत आहेत. आता मुले झाडे-झाडोरा, माती, शेती, नदीकिनारा आणि खुला निसर्ग यांच्या सानिध्यात राहून शिकत आहेत. या अनोख्या शाळा देशभरात चर्चेचा विषय बनत असून लोक याकडे भविष्यतील शिक्षणाचे एक नवीन मॉडेल म्हणून पाहत आहेत.
देशातील अनेक राज्यांमध्ये अशा शाळा चालवल्या जात आहेत. जिथे मुलांना निसर्गाच्या कुशीत शिकवले जाते. उत्तराखंड, केरळ, कर्नाटक आणि महाराष्ट्र या राज्यामध्ये काही शाळा या शेती आणि निसर्गाच्या सानिध्यात उभारल्या आहेत. या शाळांमध्ये फक्त पुस्तकी ज्ञान नव्हे तर प्रत्यक्ष अनुभवाद्वारे गोष्टी शिकवल्या जातात. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांमध्ये सृजनशीलता (Creative Thinking) अधिक वेगाने वाढीस लागताना दिसत आहे.
या शाळांमध्ये शिक्षणाची पद्धत पारंपारिक शाळांपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. येथे मुले गणित, विज्ञान आणि पर्यावरण यांसारखे विषय प्रत्यक्ष कृतीद्वारे शिकतात. यामधील अनेक शाळांमध्ये बी पेरण्यापासून ते पीक कापणीपर्यंतच्या प्रक्रियेतून मुलांना हवामान, पाणी आणि सेंद्रिय शेतीची (Organic Farming) माहिती दिली जाते. अनेक मुले स्वत: रोपे लावतात, त्यांची काळजी घेतात. ज्यामुळे त्यांच्यात सामाजिक जबाबदारीची जाणीव वाढते.
नवीन शैक्षणिक धोरण (NEP) लागू झाल्यानंतर आता ‘अनुभव आधारित शिक्षणावर’ (Experiential Learning) भर दिला जात आहे. अनेक संशोधनांमधून हे समोर आले आहे की, खुल्या वातावरणात शिकणाऱ्या मुलांची एकग्रता आणि शिकण्याची क्षमता वर्गात शिकणाऱ्या मुलांच्या तुलनेत जास्त असते. म्हणूनच या मॉडेलला भविष्यात आधुनिक शिक्षण मानले जात आहे.
शिक्षणतज्ञांच्या मते, येत्या काळात भारतातील अशा शाळांची संख्या आणखी वाढू शकते. आजच्या चार भिंतीमधील आणि स्क्रिनआधारित शिक्षणाऐवजी निसर्ग आधारित शिक्षण हे विद्यार्थ्यांना वास्तविक जगाशी जोडण्याचे काम करते. यामुळे मुले अभ्यासच करत नाहीत तर जीवन जगण्याची कलाही शिकतात. यामुळे येत्या काही वर्षात भारताच्या शिक्षण व्यवस्थेत हे मॉडेल मोठा बदल घडवून आणू शकते.






