फोटो सौजन्य- सोशल मीडिया
SSC-HSC Exam: पेपरफुटीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर राज्य शिक्षण मंडळाकडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेची गोपनीय प्रक्रिया अधिक बळकट करण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. यामध्ये प्रश्नपत्रिका डिजिटल पद्धतीने थेट केंद्रावर पाठवणे आणि उत्तरपत्रिकांचे ऑनलाईन स्क्रिनवर मुल्यांकन केले जाणार आहे. येत्या जुन-जुलै महिन्यात होणाऱ्या पुरवणी परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासण्याचे काम करण्यात येणार आहे. सुरुवातीला हा प्रयोग प्रायोगिक तत्वावर करण्यात येणार असून फक्त एका केंद्रासाठीच मर्यादित असेल. जर हा प्रयोग यशस्वी झाला, तरच पुढील परीक्षांना ही प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ सध्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे पारंपारिक पद्धतीने प्रश्नपत्रिकांचे वितरण आणि उत्तरपत्रिकांची तपासणी करते. मात्र, बदलत्या काळानुसार तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्याचे नियोजन मंडळाने केले आहे. यापूर्वी फेब्रुवारी-मार्च परीक्षेत बारामती येथून डिजीटल ट्रंकच्या माध्यमातून प्रश्नपत्रिका पाठवण्याचा प्रयोग करण्यात आला होता. आता त्यापुढील टप्पा म्हणून थेट डिजीटल प्रश्नपत्रिका पाठवण्याची यंत्रणा विकसित केली जात आहे.
या प्रयोगानुसार, पुरवणी परीक्षेत प्रश्नपत्रिका डिजिटल स्वरूपात केंद्रावर पोहोचवल्या जातील. त्यानंतर पासवर्डद्वारे त्या डाउनलोड करून त्याची प्रिंट काढण्यात येईल आणि त्या विद्यार्थ्यांना देण्यात येतील. ही प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी इंटरनेट, वीजपुरवठा, जनरेटर आशा सर्व साधनांची उपलब्धता करून देण्यात येईल. त्यानंतर परीक्षा संपल्यावर उत्तरपत्रिका ऑनलाईन स्कॅन करून त्यांचे ऑनस्क्रिन मुल्यांकन केले जाईल. यामध्ये एआयचा ही वापर केला जाईल. सध्या सावित्रीबाई फुले विद्यापीठात हा प्रयोग यशस्वीपणे राबवण्यात येत आहे.
दहावी बारावीच्या परीक्षेत अत्यल्प विद्यार्थी असलेल्या विषयांसाठी स्वतंत्र परीक्षा यंत्रणा राबवावी लागते. यामुळे मोठ्या प्रमाणात वेळ आणि पैसा खर्च होतो. तरी या विषयांचा आढावा घेऊन अनावश्यक विषय कमी करण्याचा विचार राज्य मंडळाकडून घेण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.






