फोटो सौजन्य- सोशल मीडिया
NEET UG Preparation Strategy: १६ जुलै रोजी नीटचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता देशातील लाखो विद्यार्थी समुपदेशनाची वाट पाहत आहेत. समुपदेशन सुरू होताच नीट पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना एमबीबीएसच्या अभ्यासासाठी त्यांच्या आवडीचे कॉलेज निवडण्याची संधी मिळणार आहे. दरवर्षी नीट परीक्षेच्या माध्यमातून लाखो विद्यार्थी एमबीबीएस, बीडीएस आणि इतर वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी परीक्षेला बसतात. नीट परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थी अभ्यासात दिवस-रात्र एक करतात.
नीटमधील यश हे कोणत्याही एका विषयावर अवलंबून नसून फिजिक्स (भौतिकशास्त्र), केमिस्ट्री (रसायनशास्त्र) आणि बायोलॉजी (जीवशास्त्र) या तिन्ही विषयांत मिळालेल्या एकूण गुणांच्या आधारे रँक ठरवली जाते. तरीही या तिन्ही विषयांमध्ये वेगवेगळ्या मेहनतीची गरज असते. आज आपण जाणून घेणार आहोत की फिजिक्स, केमिस्ट्री किंवा बायोलॉजी यांपैकी कोणत्या विषयात जास्त मेहनत केल्याने नीटमध्ये चांगली रँक मिळते.
नीट परीक्षा एकूण ७२० गुणांची असते. यामध्ये फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे प्रत्येकी ४५-४५ प्रश्न विचारले जातात, ज्यांना एकूण १८०-१८० गुण असतात. तर बॉटनी (वनस्पतीशास्त्र) आणि ज्युओलॉजी (प्राणीशास्त्र) मिळून बायोलॉजीमध्ये ९० प्रश्न विचारले जातात, ज्यासाठी ३६० गुण निर्धारित आहेत. म्हणजेच संपूर्ण पेपरचा अर्धा भाग केवळ बायोलॉजीचा असतो. याच कारणामुळे या विषयात मिळणारा चांगला स्कोर उमेदवारांच्या रँकवर मोठा प्रभाव पाडतो.
तज्ज्ञांच्या मते, नीटमधील रँक एकाच विषयावर ठरत नाही. अंतिम रँक ही तिन्ही विषयांत मिळालेल्या एकूण गुणांच्या आधारे तयार केली जाते. मात्र, दोन उमेदवारांचे एकूण गुण समान असतील, तर टाय-ब्रेकिंग नियमांनुसार सर्वात आधी बायोलॉजीचे गुण पाहिले जातात. त्यानंतर केमिस्ट्री आणि मग फिजिक्सच्या गुणांना प्राधान्य दिले जाते. यानंतरही समसमान गुण राहिल्यास, कमी चुकीची उत्तरे दिलेल्या उमेदवाराला प्राधान्य दिले जाते.
बायोलॉजीचा वेटेज सर्वात जास्त असला, तरी फिजिक्स हा परीक्षेतील सर्वात कठीण भाग मानला जातो. या विषयातील संकल्पना, गणिते आणि वेळेचे नियोजन यांची उत्तम समज असणे आवश्यक आहे. अनेक विद्यार्थ्यांसाठी हाच भाग सर्वात आव्हानात्मक ठरतो. अशा परिस्थितीत, जे विद्यार्थी फिजिक्समध्ये चांगली कामगिरी करतात, त्यांना रँकिंगमध्ये मोठा फायदा मिळू शकतो.
अनेक माजी नीट टॉपर्सचेही असे म्हणणे आहे की, त्यांच्या यशात फिजिक्सने सर्वात मोठी भूमिका बजावली. त्यांच्या मते, येत्या वर्षांत जर प्रश्नपत्रिकेची पातळी कठीण राहिली, तर फिजिक्सवरील मजबूत पकड विद्यार्थ्यांना उत्तम रँक आणि आवडीचे मेडिकल कॉलेज मिळवून देण्यात मदत करू शकते.
केमिस्ट्री हा नीट परीक्षेतील संतुलित आणि तुलनेने गुण मिळवून देणारा विषय मानला जातो. यामध्ये फिजिकल, ऑरगॅनिक आणि इनऑरगॅनिक केमिस्ट्रीमधून प्रश्न विचारले जातात. नियमित सराव आणि संकल्पनांची स्पष्टता असणारे विद्यार्थी या विषयात सातत्याने चांगली कामगिरी करू शकतात. अनेक तज्ज्ञांचे मते, केमिस्ट्री हा एकूण स्कोर स्थिर ठेवण्यात मोठी भूमिका बजावतो.






