फोटो सौजन्य - Social Media
शालार्थ आयडी घोटाळ्याच्या प्रकरणात जळगाव जिल्ह्यातील अमळनेरसह विविध तालुक्यांतील शिक्षक, संस्थाचालक आणि शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू झाली असून संबंधित १७ जणांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्यांना १६ व १८ रोजी नाशिक येथे चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. २० मार्च २०१९ ते २६ जून २०२५ या कालावधीत ज्यांना शालार्थ आयडी देण्यात आले आहेत, अशा सर्व कर्मचाऱ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाणार आहे. यामध्ये नियुक्ती प्रक्रियेतील जाहिरातींच्या मूळ प्रती, मुलाखतीची पत्रे, गुणपत्रक, नियुक्ती आदेश, वैयक्तिक मान्यतेची कागदपत्रे, शालार्थ प्रस्ताव आणि मंजुरीची मूळ कागदपत्रे यांचा समावेश आहे. त्यामुळे अनेक संस्थाचालक आणि संबंधित कर्मचाऱ्यांमध्ये घबराट पसरली आहे.
अमळनेर तालुक्यातील जिजाऊ विद्यालय भिलाली, सरस्वती विद्यालय पाडसे, शिवाजी हायस्कूल चौचारी, सानेगुरुजी माध्यमिक विद्यालय झाडी, पंडित नेहरू विद्यालय फापोरे, महात्मा फुले विद्यालय पिंपळी आणि योगेश्वर माध्यमिक विद्यालय अमळनेर या शाळांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील इतर अनेक शाळांतील कर्मचारीही चौकशीच्या कक्षेत आले आहेत. नाशिक विभागात सुमारे ८९२ संशयित कर्मचारी असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाची चौकशी आर्थिक गुन्हे शाखेकडूनही सुरू असून काही संस्थाचालक फरार असल्याचे सांगितले जाते. चौकशीस हजर राहिल्यास अटकेची शक्यता असून गैरहजर राहिल्यास संबंधितांवर अधिक कठोर कारवाई होऊ शकते.
या चौकशीत तत्कालीन व विद्यमान मुख्याध्यापक, संस्थाध्यक्ष, शिक्षणाधिकारी, वेतन अधीक्षक तसेच शिक्षण उपसंचालक कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. एका प्रकरणात सुमारे १० जणांना चौकशीसाठी बोलावण्यात आले असून विविध पथकांमार्फत शेकडो कर्मचाऱ्यांची चौकशी होणार आहे. विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया राबवली जात आहे.
एकंदरीत, मोठ्या प्रमाणावर कागदपत्रांची पडताळणी सुरू असल्याने संबंधितांची धावपळ उडाली असून दोषी आढळणाऱ्यांवर सेवा समाप्तीसह कडक कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.






