सौजन्य - सोशल मिडीया
लातूर : लातूर-औसा रोडवरील पेठ परिसरात सोमवारी दुपारी एका धक्कादायक अपघाताची घटना घडली आहे. निलंगा आगाराची एसटी बस रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दोन स्कूलबसवर जाऊन धडकली आहे. या अपघातात बसमधील अनेक प्रवासी जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चालकाने प्रसंगावधान राखून बस मोकळ्या जागेत नेल्यामुळे संभाव्य मोठी जीवितहानी टळल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार, निलंगा आगाराची एमएच-२० बीएल-२५७० क्रमांकाची एसटी बस दुपारी सुमारे दीड वाजता लातूर बसस्थानकातून औसाकडे निघाली होती. पेठ परिसरातील कि शाळेजवळ बस पोहोचताच बसमधील एका प्रवाशाने अचानक चालकाच्या पाठीमागे जाऊन स्टेअरिंगला हात घालत ते वळविल्याचा आरोप प्रत्यक्षदर्शी व बसमधील प्रवाशांनी केला आहे. त्यामुळे चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि बस रस्त्याच्या कडेला विद्यार्थ्यांच्या प्रतीक्षेत उभ्या असलेल्या दोन स्कूल बसवर जाऊन धडकली. या अपघातात एमएच-२६ एन-९१४३ व एमएच-२५ टी-०५८६ क्रमांकाच्या दोन्ही स्कूल बसचे मोठे नुकसान झाले. एसटी बसच्या पुढील भागाचेही मोठे नुकसान झाले आहे.
घटना घडताच बसमधील प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. अचानक झालेल्या धडकेमुळे अनेक प्रवासी जखमी झाले. त्यांना तातडीने विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्रत्यक्षदर्शीच्या मते, बसने दोन स्कूल बसना धडक दिल्यानंतरही चालकाने धैर्य न गमावता बस सुमारे शंभर फूट पुढे मोकळ्या जागेत नेऊन थांबविली. त्यामुळे बस अनियंत्रित होऊन आणखी मोठा अपघात होण्याची शक्यता टळली. त्या वेळी स्कूलबस विद्यार्थ्यांच्या प्रतीक्षेत उभ्या होत्या. सुदैवाने विद्यार्थ्यांची मोठी गर्दी नसल्याने मोठी जीवितहानी टळली. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली होती. मात्र, अपघातानंतर सुमारे अर्धा तास उलटूनही पोलीस घटनास्थळी पोहोचले नसल्याची माहिती उपस्थितांनी दिली.
चालकाच्या सतर्कतेने संकटावर मात
या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून, स्टेअरिंग ओढल्याचा आरोप असलेल्या प्रवाशाबाबतही चौकशी केली जात आहे. या अपघातामुळे लातूर-औसा मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. अपघाताचे नेमके कारण, संबंधित प्रवाशाची भूमिका आणि त्याच्याविरुद्ध कोणती कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






