Jaigad Bomb Blast: जयगड परिसरात गावठी हातबॉम्बचा स्फोट; महिला गंभीर जखमी,
Ratnagiri News: रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आज सकाळी एक धक्कादायक घटना उघडकीस आली. वाटत-जांबारी फाटा परिसरात गावठी हातबॉम्बचा स्फोट होऊन एक महिला गंभीर जखमी झाली असून, घटनास्थळावरून पोलिसांनी तब्बल २९ जिवंत गावठी हातबॉम्ब हस्तगत केल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर पोलिस यंत्रणा सतर्क झाली असून, बॉम्ब कोणी आणि कोणत्या उद्देशाने तिथे ठेवले होते, याचा तपास सुरू करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सौ. रेश्मा प्रमोद सुर्वे (वय ४७, रा. वाटत खंडाळा, जांबारी फाटा) या आज पहाटे साडेसहाच्या सुमारास जांभळी फाटा परिसरातील ‘भूत बंगला’ परिसराच्या मागील मोकळ्या जागेत बांबूची लाकडे गोळा करण्यासाठी गेल्या होत्या. लाकूड तोडत असताना त्यांच्या हाताला उघड्यावर पडलेल्या गावठी हातबॉम्बचा स्पर्श झाला आणि अचानक जोरदार स्फोट झाला.
या स्फोटात त्यांच्या डाव्या हाताच्या बोटांना गंभीर दुखापत झाली असून, त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेचा आवाज मोठा असल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
घटनेची माहिती मिळताच जयगड पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन बॉम्ब शोधक व नाशक पथक (BDDS) तसेच फॉरेन्सिक तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. परिसराची सखोल तपासणी केल्यानंतर घटनास्थळावरून आणखी २९ जिवंत गावठी हातबॉम्ब जप्त करण्यात आले.
हे हातबॉम्ब नेमके कोणी आणि कशासाठी ठेवले होते, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नसली तरी, या घटनेमुळे स्थानिकांमध्ये भीती आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
घटनेची गंभीर दखल घेत रत्नागिरीचे अप्पर पोलीस अधीक्षक तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी (DYSP) माईनकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यांनी पोलिस अधिकाऱ्यांना सखोल तपास करण्याच्या सूचना दिल्या असून, परिसरातील संशयित हालचालींची माहिती गोळा करण्याचे आदेश दिले आहेत.
फॉरेन्सिक पथकाकडून जप्त करण्यात आलेल्या बॉम्बची तपासणी केली जात असून, हे स्फोटक साहित्य किती जुने आहे, त्यामध्ये कोणत्या प्रकारचे रसायन वापरण्यात आले होते आणि त्यामागे कोणते नेटवर्क कार्यरत आहे का, याचा तपास सुरू आहे. पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, स्थानिकांकडून माहिती आणि संशयित व्यक्तींच्या हालचालींची चौकशी केली जात आहे.
दरम्यान, या घटनेनंतर जयगड परिसरात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला असून, नागरिकांना संशयास्पद वस्तूंना हात न लावण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.






