सौजन्य - नवराष्ट्र टीम
पुणे : राज्यासह देशभरात अपघाताच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. दररोज अपघातामध्ये अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागत आहे. अशातच आता पुण्यातून एक मोठी घटना समोर आली आहे. कात्रज घाटात जुन्या बोगद्याजवळ बस आणि रिक्षाची समोरासमोर जोरदार धडक झाल्याची घटना घडली आहे. या भीषण अपघातात रिक्षा चालकाचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास हा अपघात झाला असून, दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
हनुमंत रमेश हंगरगे (वय ४२ वर्षे, रा. सुखसागर नगर, बनकर शाळेजवळ, बिबवेवाडी) असे या अपघातात मृत्यू झालेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे. अपघातात राजेश इंगवले (वय ४८ वर्षे, रा. गोकुळ नगर, कात्रज-कोंढवा रस्ता), दशरथ निरगुडे (वय ४३ वर्षे, रा. अप्पर बिबवेवाडी) आणि शहाजी लक्ष्मण शिवदे (वय ४१ वर्षे, रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) हे तीन प्रवासी जखमी झाले आहेत. त्यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, कात्रज घाट बोगदा संपल्यानंतर पुण्याकडे येताना दुसऱ्या वळणावर राज्य परिवहन महामंडळाची बस स्वारगेटवरून सांगली जिल्ह्यातील विटा येथे जात होती. तर तीन प्रवाशांना घेऊन रिक्षा खेड शिवापूर येथून स्वारगेटच्या दिशेने येत होती. सायंकाळी साडे पाचच्या सुमारास जुन्या बोगद्यात रिक्षा आणि बसची समोरासमोर धडक झाली. यात रिक्षा चालकासह प्रवासी जखमी झाले. जखमींना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी पाठविले. रिक्षा चालक गंभीर जखमी झाला होता. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. तर बस चालक जालिंदर विष्णु शिंदे (वय ५३ वर्षे, रा. शेडगेवाडी, खानापूर, जि. सांगली) याला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. पुढील तपास आंबेगाव पोलीस करत आहेत.
हे सुद्धा वाचा : पुणेकरांची ‘गॅस’कोंडी! बुकिंग करूनही सिलिंडरचा पत्ता नाही; वितरण व्यवस्था कोलमडली
मद्यधुंद कारचालकांने दोन दुचाकींना उडवले
गेल्या काही दिवसाखाली मद्यधुंद अवस्थेतील कार चालकाने समोरून येणाऱ्या दोन दुचाकीना जोरदार धडक दिली आहे. या भीषण अपघातात एका दुचाकीवरील दोघांचा जागीच मूत्यू झाला आहे. तर दुसऱ्या एका दुचाकीवरील एका महिलेसह दोघे गंभीर जखमी असून, त्यांच्यावर सासवड येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. रविंद्र गोपाळ काकडे (वय ६५) आणि महेद्र संपत काकडे( वय ५३, दोघेही रा. पांगारे ता. पुरंदर) अशी अपघात मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. तर तुकाराम जयवंत पोमण (वय ६०) आणि सुरेखा तुकाराम पोमण (वय ५०, दोघेही रा. पिंपळे, ता. पुरंदर) हे पती पत्नी गंभीर जखमी आहेत. याप्रकरणी कारचालक अक्षय सुहास परख ( वय ३०, रा. अँमेनोरा हडपसर पुणे. मुळ रा. नेहापुजा कोऑपरेटीव्ह सोसायटी मिटानगर, गोरेगाव वेस्ट मुबई) याला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेची माहिती सामाजिक कार्यकर्ते प्रकाश राजाराम काकडे (वय ४०, रा पांगारे) यांनी सासवड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.






