मोठी बातमी ! कुख्यात गुंड निलेश घायवळच्या भावाला राजस्थानातून अटक; 9 महिन्यांपासून होता फरार
पुणे : कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन बन्सीलाल घायवळ (वय ४८) याला राजस्थानातून अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पुणे पोलिसांनी केली. सचिन घायवळ हा गेल्या 9 महिन्यांपासून फरार होता. वेशांतर तसेच नाव बदलून सचिन घायवळ राजस्थानात राहत होता. मात्र, आता त्याला अटक करण्यात आली आहे. मकोका कारवाईनंतर तो पुण्यातून गायब झाला होता. तत्पूर्वी लंडनस्थित निलेश घायवळचा मात्र अद्याप पुणे पोलिसांना शोध लागलेला नाही. गुन्हे शाखेच्या युनिट तीनने ही कारवाई केली आहे.
सचिन घायवळला राजस्थानातून अटक करून पुण्यात आणले. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ९ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. ही कारवाई गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रशांत अणछत्रे तसेच सहाय्यक निरीक्षक ज्ञानेश्वर ढवळे, पोलिस अंमलदार किशोर शिंदे, अक्षय गायकवाड व त्यांच्या पथकाने केली आहे.
सचिन घायवळ हा पेशाने शिक्षक आहे. एका नामांकित शाळेत तो शिक्षक म्हणून काम करत होता. पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळचा मोठा भाऊ आहे. दरम्यान, त्याच्याविरोधात देखील गुन्हे नोंद झाले आहेत. वारजे पोलिसांत ४४ लाख ३६ हजार रुपयांच्या खंडणीच्या गुन्ह्यात त्याच्यावर मोक्का कारवाई करण्यात आली होती.
खंडणीप्रकरणी पोलिसांत गुन्हा झाला दाखल
कर्वेनगर, वारजे आणि शिवणे या भागातील शाळांना खाद्यपदार्थ पुरवठा करणाऱ्या कंपनीच्या संचालक महिलेकडून खंडणी उकळल्याप्रकरणी हा गुन्हा नोंद करण्यात आला होता. याबाबत ४० वर्षीय महिलेने तक्रार दिली होती. याप्रकरणी निलेश घायवळ व सचिन घायवळ यांच्यासह इतरांवर गुन्हा नोंद करण्यात आला होता.
मकोका अंतर्गत केली गेली कारवाई
या गुन्ह्यात पुणे पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियत्रंण कायद्यानुसार (मकोका) कारवाई केली होती. दरम्यान, गुन्हा दाखल होताच सचिन घायवळ फरार झाला होता. गेल्या नऊ महिन्यांपासून तो फरार होता. पोलिस त्याचा शोध घेत होते. पण तो हाती लागत नव्हता. दरम्यान, राजस्थान येथील सिकर जिल्ह्यात राहत असल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
मंदिराच्या प्रसादावर काढले दिवस
पुण्यातून पळून गेल्यानंतर सचिन घायवळ काही काळ सोलापूरमध्ये भाड्याच्या घरात राहत होता. त्यानंतर तो जयपूरमार्गे सिकर जिल्ह्यातील दिंगपूर गावात दाखल झाला. १० फेब्रुवारीपासून तो तेथे वास्तव्यास होता. महिन्याला साडेसहा हजार रुपये भाडे देऊन तो राहत होता. फरार होताना त्याच्याकडे साडेतीन लाख रुपये रोख होते. त्याच पैशांतून तो खर्च भागवत होता. तसेच गावातील मंदिरात मिळणाऱ्या प्रसादावर त्याने अनेक दिवस काढल्याची माहिती समोर आली आहे. तो वेशांतर तसेच नाव बदलून राहत असल्याचे समोर आले आहे.






